नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. या चिन्हाशी साम्य असलेलं ‘पिपाणी’ हे चिन्ह देखील अनेक अपक्ष उमेदवारांना मिळालं होतं. चिन्हांतील गोंधळामुळे ‘पिपाणी’ला राज्यात लाखो मतं मिळाली असून सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव आहे. चिन्हांमध्ये साम्य आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, या पक्षाने आता ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.

‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाबरोबरच अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे चिन्ह दिलं गेलं. या चिन्हाला ‘तुतारी’ हे नाव असल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. ‘पिपाणी’ हे चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना देखील मोठ्या प्रमाणात मतं मिळाली. यामुळे शरद पवार गटातील उमेदवारांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा पक्षातील नेत्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात शरद पवार गटाने म्हटलं आहे की “पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला फटका बसला. त्यामुळे तुम्ही आता या संदर्भात उचित निर्णय घ्या, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.”

हे ही वाचा >> “…तर रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ दिली जाणार नाही”, संजय राऊतांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे ४५ हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात ३७ हजार मतं अपक्ष उमेदवाराच्या ‘पिपाणी’ला पडली आहेत. याबाबत जयंत पाटील म्हणाले होते, आम्ही भाषणात तुतारी चिन्हाचा प्रचार करत होतो. पण मतदारांमध्ये संभ्रम झाला. आम्ही यासदंर्भात निवडणूक आयोगाकडे मतदानापूर्वी तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. दरम्यान, आता पक्षाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, त्यांनी पिपाणी हे चिन्ह वगळावं. तसेच शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे.