बाळासाहेब ठाकरे हे माझे मित्र होते. मनाने मोठे नेते होते. त्यांना एखादा विषय त्यांना पटला नाही तर थेट फटकारायचे. त्यात कधीही कंजुसी करायचे नाहीत. पण त्यांना सरकारचा निर्णय पटला तर ते सरकारचं कौतुकही करायचे. अत्यंत मोठ्या मनाचा माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडलं आहे. नेमकं काय म्हणाले शरद पवार? बाळासाहेब ठाकरे यांचे आणि माझे व्यक्तीगत संबंध मैत्रीपूर्ण होते. बाळासाहेब ठाकरे म्हणजे मोठ्या मनाचा माणूस होते. त्यांचं वैशिष्ट्य होतं की तुमचं धोरण पटलं नाही तर ते मुक्त हस्ते शाब्दिक हल्ला करायचे. त्यात कधीही त्यांनी कंजुसी केली नाही. एखादं धोरण, निर्णय योग्य असेल तर असं वाटलं तर त्याचा राजकीय परिणाम काय होतील याचा विचार ते करत नसत. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे वडिलांची गादी चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही शारिरीक व्याधींच्या मर्यादा त्यांना आहेत. मात्र ते प्रयत्न करत असतात. वैयक्तिक टीका टाळली पाहिजे या मुलाखतीत शरद पवार यांनी फडतूस आणि काडतूस या शब्दांवरही भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला होता. तर त्यावर उत्तर देताना मी फडतूस नाही काडतूस आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की व्यक्तीगत टीका टाळली पाहिजे. तुम्हाला एखादा निर्णय पटला नाही तर तु्म्ही त्यावरून बोला. पण व्यक्तिगत टीका टाळली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणं हे टोकाचं पाऊल अदाणी प्रकरणावरून राहुल गांधी संसदेत आवाज उठवत होते. त्यानंतर मोदी नावाचे सगळे चोर का असतात असा प्रश्न त्यांनी एका भाषणात विचारला. त्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं. याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की सदस्यत्व रद्द केलं जाणं हे टोकाचं पाऊल होतं. त्यांनी टीका भाषणात टीका केली होती त्याबाबत हे टोकाचं पाऊल उचललं गेलं.