शिवसेना पक्षावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरुन सुरु झालेला वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. उद्या शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील सुनावणी होणार आहे. मात्र, खरी शिवसेना कुणाची याबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. खरी शिवसेना कुणाची ? "कोणताच पक्ष संपत नसतो. शिवसेना पक्षातील खालच्या पदाधिकाऱ्यांची अजूनही बाळासाहेब यांच्यावर निष्ठा आहे. खरी शिवसेना कोणती हे सुप्रीम कोर्ट ठरवेल", असे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलं आहे. पुण्यात मनसेच्या “गणपती आमचा किंमत तुमची २०२२” या आयेजित उपक्रमाचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या समेटीबाबत वक्तव्य एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. आमदारांनंतर खासदारांनीही शिवसेनेची साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे एकाकी पडले की काय असे चित्र निर्माण झाले होते. शिवसेनेवर ओढावलेल्या या राजकीय संकटानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील? अशा चर्चा सुरु होत्या. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही याबाबत वक्तव्य केले आहे. “साद घातली तर येूऊ देत” असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी ठाकरे बंधूंच्या समेटीबाबत सूचक वक्तव्य केले होते. “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील” “आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.