सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक केल्याने शिंदे गटाला आनंद झाल्याचं बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. मात्र ही गटाची भूमिका नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दीपक केसरकर यांनी संजय राऊतांची भाषा अत्यंत चुकीची होती. त्याबद्दल आमदारांच्या मनात राग आहे. पण म्हणून कोणावरही व्यक्तिगत कारवाई व्हावी, तुरुंगात टाकावं अशी त्यांची भावना नाही असं सांगितलं आहे.

“प्रवीण राऊत यांना कित्येक महिन्यापूर्वी अटक झाली होती. त्यानंतरही संजय राऊत यांच्यावर कारवाई न करता, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी संधी देण्यात आली होती. व्हायरल ऑडिओत ते महिलेला ईडीसमोर आपला जबाब बदलण्यास सांगत होते. मीदेखील गृहखात्यात काम केलं आहे,” असं केसरकर म्हणाले आहेत.

संजय राऊत यांना ‘ईडी’कडून अटक; सपना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलीस स्थानकात FIR दाखल

“प्रवीण राऊत यांना कित्येक महिन्यापूर्वी अटक झाली होती. त्यानंतरही संजय राऊत यांच्यावर कारवाई न करता, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी संधी देण्यात आली होती. व्हायरल ऑडिओत ते महिलेला ईडीसमोर आपला जबाब बदलण्यास सांगत होते. मीदेखील गृहखात्यात काम केलं आहे,” असं केसरकर म्हणाले आहेत.

“संजय राऊतांना कोणीही आपल्या गटात घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणी त्यांना आपल्या पक्षात घेईल असं वाटत नाही. त्यांची भाषा फारच आक्षेपार्ह असते. सत्तेत असणाऱ्या पक्षांविरोधात सातत्याने पत्रकार परिषद घेऊन चुकीचं बोलण्याचं काम त्यांनी केलं. यामुळेच शिवसेना आणि भाजपाचे संबंध दुरावले असतील याची मला खात्री आहे. त्यामुळे शिवसेनेसोबती त्यांची निष्ठा तपासण्याची गरज आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेला खूप त्रास झाला आहे,” असा आरोप केसरकरांनी केला आहे.

शिंदे गटाची भूमिका काय

“संजय राऊतांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टापुढे सादर करावेत. ते निर्दोष असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये. कोणीही दोषी असेल तर कारवाई होणं साहजिक असून आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. कारवाईला घाबरुन कोणीही आमच्याकडे येऊ नये. अशा कारवायांशी आमचा काही संबंध नसतो. आमची लढाई अस्तित्व आणि तत्वासाठी असून आम्ही ती लढत राहणार,” अशी शिंदे गटाची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

ईडीच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका; संजय राऊत यांच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांचे विधान

संजय राऊतांनी आपल्या वकिलाच्या मार्फत बाजू मांडावी आणि तुरुंगातून बाहेर यावं अशी अपेक्षा आम्ही करत असल्याचंही केसरकरांनी सांगितलं.

संजय राऊतांच्या घऱी सापडलेल्या रकमेतील १० लाखांच्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता केसरकरांनी सांगितलं की, “एकनाथ शिंदेंच्या विरोधात काही करायचं असेल आणि त्यासाठी अयोध्येला जायचं असल्याने ते पैसे राखीव ठेवले असल्याची शक्यता आहे. प्रत्येक पैशाचा स्त्रोत दाखवावा लागतो आणि तो संजय राऊतांकडे असणार. ते हुशार, बुद्धिमान असून मुद्दाम असं काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा याच्याशी काही संबंध नाही”.

“आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आमदारांना पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आम्ही त्यांना आमची घरं तपासून पाहा, पैसै सापडणार नाहीत असं आवाहन केलं होतं. कारण हा पैशांसाठी केलेला उठाव नव्हता,” असं केसरकर म्हणाले.

…अन् ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले

संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. यापूर्वी ‘ईडी’ने तीनवेळा त्यांना समन्स बजावले होते. मात्र, २७ जुलैला ‘ईडी’ने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले असताना राऊत चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर रविवारी ‘ईडी’चे पथक राऊत यांच्या घरी पोहोचले. 

बेलार्ड पिअर येथील कार्यालयात चौकशी व अटक

राऊत यांच्या खोलीतील कागदपत्रे आणि दस्तावेज ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी तपासले. यावेळी साडेअकरा लाख रुपये ‘ईडी’ने जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आपल्याला ‘ईडी’ कार्यालयात यावे लागेल, असे ‘ईडी’कडून राऊत यांना सांगण्यात आले. साडेनऊ तासांच्या ‘ईडी’च्या कारवाईनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास राऊत यांना घेऊन ‘ईडी’ अधिकारी बेलार्ड पिअर येथील कार्यालयाकडे निघाले.  निवासस्थानाबाहेर निघताना राऊत यांनी गाडीतून हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. साडेपाचच्या सुमारास राऊत ‘ईडी’च्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी राऊत यांचे भाऊ सुनील राऊत आणि वकील ‘ईडी’ कार्यालयाबाहेर उभे होते. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी चालली होती. याच चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली.

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’चे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की, लाज-लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपावर सोडले. या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.