अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार भक्कम असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. हे सरकार म्हणजे ‘फेव्हिकॉल’चा जोड आहे, असा दावा माजी राज्यमंत्री व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, सत्तेत असूनही कुणी सहजासहजी बाहेर पडत नाही. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचलो होतो. त्यावेळी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. जेव्हा त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही मंत्रिपदाच्या किंवा पैशांच्या लालसेने शिंदे यांच्यासोबत गेलो नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या काही अपेक्षा असतात. सत्तेत राहून विकासाची बरीच कामे करता येतात, म्हणून आपण शिंदे सरकारला पाठिंबा दिला.

जर मंत्रिपद मिळाले, तर सामाजिक न्याय व अपंग कल्याण यासारख्या विभागात काम करायला मिळावे, अशी इच्छा राहील. अनाथ, अपंग, शेतकरी शेतमजूर यांच्या हितासाठी आयुष्यभर काम करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे कडू म्हणाले.