तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मॉलमधली वाईनविक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. यावरून आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

“सध्याचे नवे हिंदूहृदयसम्राट…”, दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पटोलेंचा शिंदे गटाला टोला!

“भाजपा सत्तेत आल्यानंतर वाईन बाबतीत ‘एकदम ओके’ झाली आहे..! विरोधात असताना वाईन विक्रीला मॉलमध्ये मंजूरी मिळू नये म्हणून यांनी गावबोभाटा केला आणि आता त्याच वाईनला हे उराशी कवटाळत आहेत.” असं नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – नाना पटोले

राज्यात मॉलमध्ये वाईन विक्रीच्या धोरणाला मंजुरी देण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारने सुरु केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने हाच प्रयत्न केला होता. तेव्हा भाजपने याला कडाडून विरोध केला. भाजपसाठी तेव्हा वाईट असेलली ‘वाईन’ आता ‘फाईन’ झाली आहे. भाजप केवळ विरोधासाठी विरोध करतो, हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? –

“मॉलमध्ये वाईन विक्रीचा मसुदा जेव्हा जनेसाठी खुला करण्यात आला होता. आम्ही या संदर्भात लोकांची मत जाणून घेतली. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अनेकांनी याबाबत सुचना केल्या आहेत. त्यानुसार या निर्णयाच्या समर्थनात आणि विरोधात किती जणं आहेत, त्याचा अभ्यास सुरू आहे. विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर काम करत आहेत. येत्या १५ दिवसांत यासंदर्भातला अहवाल माझ्याकडे येईल, त्यानंतर मी स्वत: याचा अभ्यास करून लोकांची मत काय आहेत, हे जाणून घेतल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चाही करणार आहे”, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.