राज्यातील सत्तासंघर्षावर, आमदार, अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात आज ( २७ सप्टेंबर ) सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून, उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. त्यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“शिवसेना पक्ष कुणाची जहागीर नाही आहे. दोन तृतीअंश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोग घेणार, हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. परंतु, चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये सहानभुती मिळवण्यासाठी कारणे सांगून, सर्वोच्च न्यायालयाचा आधार ‘मातोश्री’ने घेतला. न्यायालयाने मोठी चपराक उद्धव ठाकरेंना दिली आहे. अखेर विजय सत्याचाच होणार आहे. नवरात्रात देवीने दिलेला हा प्रसाद समजू,” असे नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आम्ही पहिल्या…”

“न्यायालयात नेहमी सत्याचा विजय होतो”

“हा निकाल म्हणजे सत्याचा विजय आहे. घटनापीठाची स्थापना झाल्यानंतर मला वाटतं पहिलीच सुनावणी आहे. न्यायालयात नेहमी सत्याचा विजय होतो. सत्याच्या बाजूने निकाल दिले जातात. निवडणूक आयोग आणि न्यायालय या वेगळ्या गोष्टी आहेत असं आम्ही आधीपासून सांगत होते. तेच आज न्यायालयाने सांगितलं. न्यायालयाने निवडणूक आयोगाला थांबवू शकत नाही असं सांगितलं आहे. हे आमचं मोठं यश,” असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.