शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी ठाकरे परिवारावर दापोलीतील एका सभेत टीका केली होती. त्यावरून बरं झालं घाण गेली, त्या घाणीने दाखवले घाण घाण असते, असे माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होते. त्याला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रामदास कदम म्हणाले की, “आपण काय, कोणाबद्दल बोलतो कसली घाण. घाण नसती तर तुम्ही शिल्लक राहिला असता का? पेडणेकर घरी येऊन माझ्या पाया पडत होत्या. त्या आज मला घाण म्हणतात. घाण असलेल्या माणसाच्या तुम्ही पाया पडता. उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी बोलू नका. अनेक वादळे छातीवर घेतली आहे. माझ्या हत्येच्या अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. डोक्याला कफन बांधून मी लढलो आहे. याची जाणीव ठेऊन मग बोला,” असा सल्ला रामदास कदम यांनी दिला आहे.

हेही वाचा – “राष्ट्रवादीची उपशाखा असलेल्या नवाबसेनेने बाळासाहेबांची…”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

“उद्धव ठाकरे गाडीत मला बसवल्याशिवाय…”

नारायण राणे बाहेर पडल्यानंतर शिवसेना कोणी वाचवली? छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर गेल्यावर नागपुरातून आमदारांना मुंबईला कोणी आणलं? याची या लोकांना कल्पना नाही आहे. उद्धव ठाकरे एक वर्ष मला गाडीत बसवल्याशिवाय मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते. शिवसेना फुटली त्याच दु:ख मला आहे. तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार हा निर्णय घ्यायचा होता. उद्धव ठाकरेंशी बोललो तेव्हा दोन पाऊले मागे या आपला पक्ष वाचवा, गुवाहटीवरून आमदारांना मी आणतो सांगितलेलं. मात्र, शरद पवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी कायद्याची लढाई लढत असल्याचं म्हटलं, असेही रामदास कदम म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.