लक्ष्मण राऊत

जालना लोकसभा मतदारसंघातील पठण येथे विकासकामांचा शुभारंभ करताना भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी करोना निर्मूलनसाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचे निमित्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याबद्दल टीका केली. या संदर्भातील ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवे यांना प्रत्युत्तर दिले.

भाजपचे अन्य नेते पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडलेले असताना मुख्यमंत्री मात्र ‘मी आणि माझे कुटुंब’ एवढय़ापुरतेच मर्यादित असल्याची टीका दानवे यांनी केली. बाहेर पडल्यास मुख्यमंत्र्यांना करोना खातो काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. याचे उत्तर मला सांगू नका, तर गावात जाऊन सांगा, बस स्थानकावर सांगा, असा सल्ला त्यांनी दिला.

दानवे यांचे भाषण टिंगल-टवाळीकडे जाणारे असल्याची भावना झाल्यामुळे जालना जिल्ह्य़ातील अनेक शिवसनिकांनी खोतकर यांच्याकडे प्रतिक्रिया नोंदविल्या. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दानवे आणि खोतकर एकत्र आल्याचे चित्र होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांच्यातील अंतर पुन्हा वाढले. दानवे यांच्या पठण येथील वक्तव्याचा समाचार घेताना खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या दानवेंना मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणे शोभा देणारे नाही. काही मंडळी आपली लायकी विसरून वक्तव्ये करतात. त्यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये. प्रत्येक बाबतीत घाणेरडे राजकारण करण्याची दानवेंना सवय झालेली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवीत असून करोनाविरुद्धच्या मोहिमेत युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे, याची जाणीव दानवे आणि भाजपच्या अन्य नेतेमंडळींना आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी काम करीत असल्यानेच भाजपची पोटदुखी वाढली आहे. त्यांना जनतेशी देणे-घेणे नाही तर चोवीस तास फक्त राजकारणच करायचे आहे, असेही खोतकर म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न असोत की करोनासंदर्भातील तक्रारी असोत, भाजपची नेतेमंडळी घरात बसलेली नाहीत. राज्य सरकारमधील प्रमुखांनी घराबाहेर पडावे अशी अपेक्षा ठेवण्यात गर काय आहे? खासदार रावसाहेब दानवे यांची यानिमित्ताने लायकी काढण्याचे काही कारण नाही. लायकी निवडणूक निकालांमधून दिसत असते. राज्य सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येत नसेल तर टीका होणारच.

-आमदार संतोष दानवे, अध्यक्ष, जालना जिल्हा भाजप

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तसेच अन्य प्रश्नांची सोडवणूक आणि करोनाविरुद्धचा लढा रावसाहेब दानवे यांना दिसत नाही का? राज्यातील सर्व मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहे. उद्धव ठाकरे केवळ दूरचित्रप्रणालीद्वारेच संवाद साधतात असे नव्हे तर त्यांनीही अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. भाजपमध्ये एवढी लायकी होती तर मुख्यमंत्रीपद त्यांना का मिळाले नाही? अघळ-पघळ बोलत दोन घटका जनतेची करमणूक करण्याचा दानवेंचा स्वभाव आहे. सरकारच्या कामाकडे ते डोळेझाक करतात.

-अर्जुन खोतकर, माजी मंत्री, शिवसेना</p>