राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नबाब मलिक हे दाऊद इब्राहीमशी संबंधित व्यक्तींबरोबर आर्थिक गैरव्यवहार करीत असताना त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दाऊद इब्राहीमची बी टीम आहेत, असा आरोप भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सोमवारी दुपारी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राणे कुटुंबीय विमानाने सोलापुरात आले होते. विमानतळावर आमदार नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. उध्दव ठाकरे हे आजही घरातून सहसा बाहेर पडत नाहीत. त्यांनी मैदानावर येऊन आमच्याशी मर्दासारखे दोन हात करावेत. नामर्दासारखे केवळ नोटिसा पाठवू नये, असे नितेश राणे म्हणाले. “शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिले आहे. त्यांच्या राज्यात हिंदूंच्या सण-उत्सवांवर निर्बंध लादायचे आणि इतर धर्मियांच्या सणांना मोकळीक द्यायची. शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या काय, हे ठाकरे यांनी सांगावे,” अशा शब्दात राणे यांनी टोलेबाजी केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना म्हणजे विचार, दिशा, वाट नसलेला पक्ष झाला आहे. उद्या शिवसेना एमआयएमच काय, आणखी कोणत्याही पक्षाबरोबर मैत्री करेल, अशी टीका केली.