मुंबई: राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदीचा समावेश करण्याची सक्ती केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. याबाबत सरकारकडून नेमण्यात आलेल्या त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची ‘माताेश्री’ येथे भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती लादू नका अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याची माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.

राज्यातील भाषिक धोरणाविषयी जनमत समजून घेण्यासाठी आणि त्रिसूत्री भाषा समितीच्या शिफारशींबाबत डॉ. जाधव विविध नेत्यांशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतली. शैक्षणिक विषयासह हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सविस्तर सुसंवाद झाला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. ठाकरेंनी यावेळी शालेय अभ्यासक्रमातील भाषेबाबत विविध मुद्दे मांडले. हिंदी सक्तीच्या विरोधात स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली तसेच शिक्षणातील भाषिक निर्णय हे केंद्राने लादण्याऐवजी राज्यांनी ठरवावेत, असा ठाकरेंचा आग्रह होता. मात्र, हिंदीची सक्ती सरसकट केली जाणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

भाषा समितीच्या अंतिम अहवालाची तयारी सुरू असून विविध राज्यांतून मिळालेल्या प्रतिक्रिया त्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. बुधवारी नाशिक आणि १३ नोव्हेंबरला पुणे येथे जनमत जाणून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. लोकांचे प्रश्न, समस्या आणि भाषा संदर्भात मत जाणून घेण्यात येतील. त्यानंतरच भाषेबाबत भूमिका जाहीर केली जाईल, असा निर्वाळा ठाकरे यांना दिल्याचे जाधव म्हणाले. दरम्यान, येत्या २० डिसेंबरला त्रिसूत्री भाषा समितीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.