“सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळेच माझा पराभव झाला. पक्षश्रेष्ठींनी दिलेले उमेदवार पराभूत झाले. त्यांना सहकार्य करणाऱ्या पॅनेलच्या प्रमुखांनी माझ्या पराभवावर कोणताही खुलासा केला नाही.” असं आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, माझ्या पराभवामागे त्यांचेच षडयंत्र आहे, असे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. आपली भूमिका जाहीर केली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.

शशिकांत शिंदे म्हणाले, “सर्वांनी एकत्र बसून बँकेच्या निवडणुकीची व्यहरचना केली होती. सर्वजण एकत्र काम करत असताना आतून एक आणि बाहेरून एक असं करण्याची गरज नव्हती. मला थांबायला सांगितलं असतं तर मी थांबलो असतो. जे शेवट पर्यंत मी निवडून येणार असे सांगत फिरत होते त्यांनी व पॅनल प्रमुखांनी एकत्र बैठक शेवट पर्यंत का लावली नाही. मी काय उपरा नव्हतो. जो आमदार अथवा जेष्ठ कार्यकर्ता ज्या मतदार संघातील भागातील आहे, त्याने तो भाग बघायचा असे आमच्यात ठरलेले असताना त्यांना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना मतदार संघ दिला तेव्हा ही मी जावलीतील होतो. त्यांनी माझ्याशी किमान चर्चा तर करायची.”

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पराभूत

तसेच, “एकाच दिवसात सगळे अर्ज निघाले आणि हे बिनविरोध कसे झाले हे शोधले पाहिजे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे विषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का? या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे नऊ आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा.”

याचबरोबर “बॅंकेच्या निवडणुकीत ज्या दिवशी माझा पराभव झाला, त्याच दिवशी माझ्या विरोधात कट करस्थान करणारे नाचले, हे सर्वांनी पाहिलंय. मला गुंडगिरी करायची असती, तर मी गोव्यापासून सावंतवाडी ते अगदी जिथं-जिथं उमेदवार होते तेथून मी उचलले असते. परंतु ते माझ्या रक्तातच नाही. शेवटपर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यशस्वी का केलं नाही, कारण त्यांनी मनापासून केलंच नाही. माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार आहेत, हे त्यांचंच षडयंत्र आहे.” असा थेट आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे राजकारण झाले ते यापुढील निवडणुकीत होऊ नये, याची काळजी घेतली जावी. जे लोक विरोधात काम करतात ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकत असूनही पराभूत होतो यामागे पक्षातील नेत्यांचे षडयंत्र आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले.