रविवारी दापोलीमध्ये शिंदे गटाची सभा झाली आहे. या सभेतून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. येत्या काळात मी चिपळून आणि गुहागर येथे सभा घेऊन भास्कर जाधवांची पळता भुई थोडी करणार आहे, असं रामदास कदमांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसेच भास्कर जाधव माझ्या पाया पडले, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. या विधानानंतर शिवसेना नेते भास्कर जाधवांनी त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

रामदास कदमांच्या विधानावर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले की, मी रामदास कदमांच्या पाया पडलो ही वस्तुस्थिती आहे. पण मी कधी पाया पडलो, हे महत्त्वाचं आहे. माझे वडील वारल्यानंतर रामदास कदम सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी आले होते. यावेळी मी आणि माझ्या पत्नीने त्यांना नमस्कार केला.

हेही वाचा- “तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या काही झालं तर अग्नी कोण देणार? त्या प्रश्नावर मी म्हणालो…”; शरद पवारांनी सांगितली आठवण

पुढे भास्कर जाधव म्हणाले की, आहो, रामदास कदम तुमच्याकडे काही वैचारीक पातळी आहे की नाही? माझ्या घरी तुम्ही माझं सांत्वन करायला आला होता. त्यावेळी तटकरे, अनंतराव गीते आणि हसन मुश्रीफही आले होते. आमच्या घरी सांत्वन करायला आलेल्या मुश्रीफांपासून सगळ्यांच्या आम्ही सपत्नीक पाया पडलो. कारण माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. माझे समवयस्क किंवा माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मंडळींना आम्ही नमस्कार करतो. त्यामुळे वडील वारल्यानंतर सांत्वन करण्यासाठी घरी आलेल्या रामदास कदमांना आम्ही नमस्कार केला, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण रामदास कदमांनी याचा संबंध राजकारणाशी जोडला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की, रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करायला हवं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “…तर राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील” ‘त्या’ विधानावरून भास्कर जाधवांची खोचक टीका

रामदास कदम यांची दापोलीतील सभा संपूर्ण राजकीय-वैचारीक बैठकीला छेद देणारी सभा होती. रामदास कदमांनी वापरलेली भाषा आजतागायत कुणीही वापरली नाही. रामदास कदमांनी वापरलेल्या भाषेचा विषय जस-जसा महाराष्ट्रात जाईल, तसतशी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील. मुंबईत एक कोटी ३० लाख जनता राहते, त्या जनतेकरता मुंबईत शौचालयांची व्यवस्था आहे. त्या शौचालयांतून जेवढी घाण बाहेर पडत नाही, तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली, अशी टीकाही भास्कर जाधवांनी केली आहे.