रविवारी दापोलीमध्ये शिंदे गटाची सभा झाली आहे. या सभेतून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. येत्या काळात मी चिपळून आणि गुहागर येथे सभा घेऊन भास्कर जाधवांची पळता भुई थोडी करणार आहे, असं रामदास कदमांनी आपल्या भाषणात म्हटलं. रामदास कदमांच्या टीकेनंतर शिवसेना नेते भास्कर जाधवांनी त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

रामदास कदमांना तातडीने वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा, नाहीतर हा माणूस काहीतरी अघटीत घडवेल, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. भास्कर जाधव यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर रामदास कदमांना खडेबोल सुनावले आहेत.

रामदास कदम यांची दापोलीतील सभा संपूर्ण राजकीय-वैचारीक बैठकीला छेद देणारी सभा होती. रामदास कदमांनी वापरलेली भाषा आजतागायत कुणीही वापरली नाही. रामदास कदमांनी वापरलेल्या भाषेचा विषय जस-जसा महाराष्ट्रात जाईल, तसतशी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील. मुंबईत एक कोटी ३० लाख जनता राहते, त्या जनतेकरता मुंबईत शौचालयांची व्यवस्था आहे. त्या शौचालयांतून जेवढी घाण बाहेर पडत नाही, तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा- बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का? रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेही लक्ष्य

रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं, ते मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही, खासगीमध्येही त्याचा उल्लेख करू शकत नाही. ते विधान जेव्हा महाराष्ट्रातील लोकांच्या कानावर जाईल, तेव्हा रामदास कदमांची जोड्यानं पूजा होईल. त्यामुळे मला वाटतं की, रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करायला हवं.

हेही वाचा- “मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही तेवढी…”, भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्लाबोल; म्हणाले, “तातडीने वेड्याच्या…”

राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की, तुम्ही रामदास कदमांना तात्काळ नेते पदावरून केलं पाहिजे. नाहीतर ते तुमची प्रतिमासुद्धा पूर्णपणे मलीन केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी तात्काळ रामदास कदमांना नेते पदावरून दूर करावं किंवा वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावं. नाहीतर हा माणूस काही ना काही अघटीत घडवेल, असं मला वाटतं, अशी टीका भास्कर जाधवांनी दिली आहे.