शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईला गेल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. पण ते मुंबईलाच येणार की दिल्लीला जाणार याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यांनी गुवाहाटी सोडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. या घडामोडीनंतर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी बंडखोर आमदांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोर आमदारांना मिळणार नाही, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.

शिवसेना पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरता येणार नाही.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची आमदारकी वाचवायची असेल, तर कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागेल. तसं झालं नाही तर अपात्रतेतून सुटका मिळणार नाही. विलीन होताना नोंदणीकृत पक्षात विलिन व्हावं लागेल किंवा स्वतःचा गट काढावा लागेल. त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे त्यांना भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलिन व्हावं लागेल.” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर त्यांनी जावं

“निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे शिवसेना पक्षाची घटना आहे. त्याप्रमाणे कार्यकारणीच्या सदस्यांमार्फत प्रक्रिया करावी लागेल. विधिमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेच्या चिन्हासाठी ६ टक्के मतं मिळवावी लागतात. त्यामुळे विरोधकांना जोपर्यंत ४-६ टक्के मतं मिळत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्ह गोठवत नाही. त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर त्यांनी जावं,” असंही नीलम गोऱ्हे यांनी नमूद केलं.