इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीत मतभेदांना स्थान आहे, पण देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. हिंदुस्थानने ती परंपरा व संस्कृती गमावली आहे अशी खंतही शिवसेनेने व्यक्त केली आहे. आज स्वर्गात ध्यानचंद यांनाही तसे वाईटच वाटले असेल असंही यावेळी शिवसेनेने म्हटलं आहे.

काय आहे सामना संपादकीयमध्ये-

“सध्या देशाचे वातावरण खेळमय झाले आहे. एरव्ही ते क्रिकेटमय झालेले दिसते. टोकियो ऑलिम्पिकमुळे देशात इतर खेळांवर उत्साहाने चर्चा होत असताना निरज चोप्रा याने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण क्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. 1991-92 सालापासून राजीव गांधींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. अनेक महान खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केला गेला, पण राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असे यापैकी कोणीही म्हटल्याचे दिसत नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही
“आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी हॉकी संघास ब्राँझ पदक मिळताच मोदी सरकारने राजीव गांधींचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे हे अनाकलनीय आहे. मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. श्री. अमित शहा म्हणतात, देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार महानतम खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. खेळ जगताशी जोडलेल्या प्रत्येकाची छाती त्यामुळे गर्वाने फुलली असेल. गृहमंत्री शहा यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. त्यांनी जे सांगितले व कृतीत उतरवले त्याबाबत वाद करण्यात अर्थ नाही. कारण गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसच्या सरकारने, नेहरू, गांधी, राव, मनमोहन, मोरारजी, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर यांनी जे काही केले ते सर्व धुवून आणि पुसून टाकायचे, असे कुणाचे राष्ट्रीय धोरण किंवा राज्य चालवायची भूमिका असेल, तर कपाळ पह्डून उपयोग नाही. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल,” असं शिवसेनेने सुनावलं आहे.

…हे द्वेषाचे राजकारण आहे

“मिल्खा सिंग, ध्यानचंद ही अशी नावे आहेत की, देशवासीयांना त्यांचे विस्मरण कधीच होणार नाही. आज मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले. याचा अर्थ आधीच्या सरकारांना ध्यानचंद यांचे विस्मरण झाले होते असे नाही. 1956 साली ध्यानचंद यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले. 3 डिसेंबर 1979 रोजी या महान खेळाडूचे दिल्लीत निधन झाले. ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान केले जातात. मेजर ध्यानचंद व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठेच आहे. ते एक उत्तम माणूस होते व पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱया राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे मेजर ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असे मानता येत नाही. राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेषाचे राजकारण आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली?

“ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, ‘राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?’ हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे, पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. मग श्री. मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली? किंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत स्टेडियमचे नामकरण केले. तेथेही तोच निकष लावता येईल, असा प्रश्न लोक विचारत आहेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत ‘ऑलिम्पिक’चे बजेटच साधारण तीनशे कोटींनी कापले

“क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांचे प्रशासन आज गैर खेळाडूंच्याच हातात गेले आहे, हे कसले लक्षण मानायचे? ध्यानचंद हे मोठेच खेळाडू होते, पण 41 वर्षे हॉकीत विजयाचा आणि पदकांचा दुष्काळ पडला असताना कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन अशा खेळांत ज्या खेळाडूंनी वैयक्तिक पदके ऑलिम्पिकमधून आणली त्यांचे योगदान मेजर ध्यानचंद यांच्यापेक्षा कमी नाही. मोदी सरकार आज ऑलिम्पिक पदकांचा उत्सव साजरा करीत आहे, पण मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत ‘ऑलिम्पिक’चे बजेटच साधारण तीनशे कोटींनी कापले. हिंदुस्थानी महिला-पुरुष हॉकी संघाचे प्रायोजकत्व ‘सहारा’ने काढून घेतल्यावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दोन्ही हॉकी संघांचे पालकत्व स्वीकारले. त्यामुळे ‘हॉकी’ यशाचे श्रेय जसे त्या संघाच्या मेहनतीस तितकेच ते ओडिशाच्या नवीन बाबूंचे आहे,” असं शिवसेना म्हणाली आहे.

खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार व्हावा….

“पी. व्ही. सिंधू हिने तर सलग दुसऱयांदा ऑलिम्पिक पदक जिंकले. महाराष्ट्राचे खाशाबा जाधव यांचे कर्तृत्वही मोठेच आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकणारे ते महान पुस्तीपटू होते. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली तेव्हा खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार व्हावा, असा सूज्ञ विचार कुणाच्या मनात का येऊ नये? ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार, तसे खाशाबा हे पुस्तीचे जादूगार होतेच. लोकभावना वगैरे बोलायला ठीक आहे, पण सध्या राज्यकर्ते ठरवतात तीच लोकभावना व त्या लोकभावनेवर भजनाचे टाळ वाजवणे हेच सुरू आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.