दसऱ्यानिमित्त शिवसेनेचा दसरा मेळावा आज पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात फोडला जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबईतील विकास कामांबाबतचे विशेष सादरीकरण या दसरा मेळाव्यात केले जाणार आहे. दरम्यान संध्याकाळी जेव्हा उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहतील तेव्हा विजायदशमीनिमित्त जी शस्त्रं काढली जातात ती कोणासाठी कशासाठी काढली जातात हे कळेल असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. मधल्या काळात देशात, राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवतीर्थावर मेळावा होऊ शकत नाही, त्यामुळे षणमुखानंद हॉलमध्ये नियमांचं पालन करुन आजचा मेळावा होईल, त्यातून महाराष्ट्राला, देशाला, राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
मोहन भागवत यांनी संघाच्या विजयदशमी उत्सवात बोलताना ड्रग्ज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सरसंघचालक मोहन भागवत जे म्हणाले आहेत ते योग्य बोलले आहेत. ते जे मत मांडतात त्याचं महत्व असतं. पण जर नार्कोटिक्स, ड्रग्जचा पैसा देशविरोधात कोणी वापरत असेल तर मग सरकार काय करतंय? सरकार कोणाचं आहे? सरकारचं प्रमुख कोण आहे? नोटबंदी केल्यानंतर मोदींनीच ड्रग्जचा पैसा जो दहशतवादी, माफियांना मिळतो तो बंद होईल असं सांगितलं होतं. पण जर असं झालं नसेल तर सरसंघचालकांची चिंता योग्य आहे. आम्ही त्या चिंतेशी सहमत आहोत”.
“देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान असतानाही जर असं होत असेल तर सरसंघचालक याची जबाबदारी कोणावर ठोकणार? हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.
करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट दसरा मेळावा घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. उपस्थितीच्या मर्यादेमुळे हा दसरा मेळावा शुक्रवारी शिवाजी पार्कऐवजी षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना योग्य तो राजकीय संदेश देऊन निवडणुकीच्या कामासाठी त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यातील संवादाची संधी साधतील. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणात पुढील राजकीय दिशा आणि विरोधकांचा समाचार असेलच पण त्याचबरोबर शिवसेनेने मुंबईच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील.