काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि काँग्रेस अशी लढत होते त्याच राज्यांमध्ये भाजपा वाढत असल्याचे सांगत काँग्रेसला बुधवारी डिवचले. दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या ममतांनी यांनी काँग्रेसवर टीका केली. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखं परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. दरम्यान ममता बॅनर्जींच्या या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल बाहेर पडले असून इतर पक्षही बाहेर पडत आहेत. एकेकाळी आम्ही एनडीएत होतो. युपीए मजबूत करण्याची गरज आहे हे सत्य,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ममतांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा नेत्यांना राऊतांनी सुनावलं; म्हणाले “तुम्हाला जुलाब का सुरु झालेत हे…”

राहुल गांधी परदेशात असतात या ममतांच्या टीकेवर बोलताना त्यांनी म्हटलं की, “राहुल गांधी परदेशात आहेत की नाही माहिती नाही. फक्त करोनामुळे पंतप्रधान परदेशात नाहीत इतकंच आहे. ते सुद्दा परदेशात असतात. त्यावर कोणी टिका-टिप्पणी कोणी करु नये”.

‘यूपीए’ अस्तित्वात आहेच कुठे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना तसंच नागरी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या कमकुवतपणावर बोट ठेवलं. भाजपला समर्थ पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे काय, या प्रश्नावर यूपीएच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करीत ममतांनी यूपीएच्या मोकळय़ा खुर्चीवर त्यांनी बसावे काय, असा सवाल केला. समविचारी शक्ती एकत्र आल्यास भाजपचा पराभव करणे सहज शक्य असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. त्यासाठी जेथे ज्या पक्षांची ताकद आहे त्यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठीच भेट दिल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितलं.

मतांचे विभाजन टाळावे

देशातील समविचार पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज आहे. भाजपच्या पराभवासाठी समविचार पक्षांच्या मतांचे विभाजन टाळणे आवश्यक असल्याचे मत ममता बॅनर्जी यांनी नागरी समाजाच्या (सिव्हील सोसायटी) प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले. या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीका केली. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षांना दिशा देण्याच्या उद्देशाने नागरी समाजासह समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेले मार्गदर्शक मंडळ स्थापन करण्याची सूचना आपण काँग्रेसला केली होती, पण काँग्रेसने ही सूचना गांभीर्याने घेतली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भाजप विरोधी आघाडीचे २०२४च्या निवडणुकीत आपण नेतृत्व करणार का, या प्रश्नावर आपण सामान्य कार्यकर्ते असून, सामान्य कार्यकर्ते म्हणूनच काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त करीत असे पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो, असे मतही त्यांनी मांडले. काँग्रेस लढत नसलेल्या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस भाजपला वाढू देणार नाही. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजप सरकारने सर्वच क्षेत्रांमध्ये मुस्कटदाबी सुरू केली आहे. मनोरंजन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. महेश भट, शाहरूख खान आदींना त्याचा फटका बसला आहे. उजव्या विचारसरणीच्या कार्यकत्र्यांकडून निधर्मवादी, नागरी समाजाच्या कार्यकत्र्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. या बैठकीत मेधा पाटकर, जावेद आख्तर, स्वरा भास्कर, शोभा डे, महेश भट, रिचा छड्डा आदी सहभागी झाले होते.

दोन दिवसांच्या मुंबई भेटीत ममतांनी शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या भेटी घेतल्या. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये गुंतवणुकीसाठी उद्योगपतींबरोबर चर्चा केली.