गेल्या काही दिवसांपासून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयीय सत्ताधारी भाजपामधील काही नेतेमंडळींनी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनीही या विधानांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमवीर “उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या” म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राज्यपालांना महाराष्ट्रातून परत बोलावलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

भाजपा आमदार, मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केल्यामुळे वाद निर्माण झाला. “शिवाजी महाराजांना आग्र्याच्या किल्ल्यात औरंगजेबाने बंद केले होते. पण हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराज त्या किल्ल्यातून बाहेर पडले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना थांबवण्याचेही खूप प्रयत्न झालेत. पण शिंदेंही बाहेर पडले. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं लोढा म्हणाले. यावरून विरोधकांनी भाजपाला घेरलं आहे.

“लवकरच सडेतोड उत्तर मिळेल”

संजय राऊतांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मंगलप्रभात लोढा आणि भाजपावर टीका केली आहे. “राज्यातलं सरकार आणि सरकारच्या प्रमुख लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जास्तीत जास्त अपमान कोण करतंय? ही स्पर्धा सुरू झालीये. मंगलप्रभात लोढाही त्यात सामील झाले आहेत. ठीक आहे. महाराष्ट्राची आणि देशाची जनता डोळे बंद करून बसलेली नाही. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना लवकरच सडेतोड उत्तर मिळेल”, असं राऊत म्हणाले.

मंगल प्रभात लोढांकडून शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; म्हणाले, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, त्याचप्रमाणे…”

“किमान पर्यटनमंत्र्यांना तरी…”

दरम्यान, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही संजय राऊतांनी सुनावलं आहे. “मंगलप्रभात लोढा राज्याचे पर्यटन मंत्री आहेत. किमान राज्याच्या पर्यटन मंत्र्याला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती पाहिजे.राज्याचे पर्यटनमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका पक्षाशी बेईमानी करणाऱ्याशी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बेईमान होते का? तुम्ही छत्रपतींनाच एका अर्थाने बेईमान ठरवताय. भाजपाचे एक नेते सुधांशू त्रिवेदींनी छत्रपतींना माफीवीर ठरवलं, राज्यपालांनी छत्रपती जुने झाले असं सांगितलं आणि आता पुन्हा एकदा छत्रपतींची तुलना एका बेईमान व्यक्तीशी तुलना करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे”, असं राऊत म्हणाले.

“कौन करेगा छत्रपतीका अपमान?”

“सध्याचं खोके सरकारमध्ये कोण छत्रपतींचा सगळ्यात जास्त अपमान करेल याची स्पर्धा लागली आहे का? त्याला दिल्लीनं मोठं बक्षीस लावलंय का कौन बनेगा करोडपतीसारखं? ‘कौन करेगा छत्रपतीका अपमान’. असंच दिसतंय. जो उठतोय तो छत्रपतींचा अपमान करतोय. छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा अपमान नाही का? छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेची तुलना तुम्ही बेईमान लोकांच्या बंडखोरीशी करत असाल, तर त्याला योग्य पद्धतीने लवकरच उत्तर दिलं जाईल”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मंगलप्रभात लोढांच्या विधानाचा समाचार घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut slams bjp mangal prabhat lodha statement shivaji maharaj pmw
First published on: 01-12-2022 at 10:41 IST