राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. "विरोधकांचे बॉम्बस्फोट नसून लवंगी फटाकेही नव्हते, आमच्याकडेही भरपूर बॉम्ब आहेत", असं फडणवीसांनी म्हटल्यानंतर त्यावरून संजय राऊतांनी टीकास्र सोडलं आहे. काय म्हणाले संजय राऊत? "कधीकाळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते. तेव्हा त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. एकनाथ खडसे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे इतर सहकारी यांनी त्या काळी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आणली. मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. पण आज सत्तेत असताना त्यांना विरोधी पक्ष काढत असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाकेही वाटत नाहीत. एवढे बदलले आमचे देवेंद्रजी?" असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला आहे. "…म्हणून आम्ही ही भूमिका घेतली" "आम्ही नागपूरला आलो आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोबत आहेत. आम्ही म्हणालो होतो की आम्ही काही बॉम्ब फोडू. काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की वाती तयार आहेत. अजून अधिवेशन संपलेलं नाही. मुख्य म्हणजे आमच्यासाठी यावेळेला सीमाप्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या बॉम्बस्फोटात सीमाप्रश्नाबाबतचा आम्हाला हवा असलेला ठराव वाहून जाऊ नये आणि सरकारला कारण मिळू नये, यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे", असंही संजय राऊत म्हणाले. “आमच्याजवळही भरपूर बॉम्ब” म्हणणाऱ्या फडणवीसांना ठाकरे गटाचं खोचक प्रत्युत्तर; म्हणे, “ज्या गावच्या बाभळी..” ! "सरकारने ज्या प्रकारचा ठराव तयार केलाय, तो अत्यंत बुळचट आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा या मुद्द्याचा ठरावात उल्लेखही नाही. हा कसला ठराव, हा तर बेडकांचा डराव आहे. त्यामुळे लवंगी फटाका आहे की बॉम्बस्फोट आहे याचा निर्णय लागेल. पण दोन दिवसांपासून विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तारांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेतला आहे. हा लवंगी फटाका आहे का? कोट्यवधींचा व्यवहार झाला. कृषी महोत्सवासाठी काही कोटींची ठेकेदारी दिली पैसे गोळा करायला, हा काय लवंगी फटाका झाला? एनआयटीचे १६ भूखंड वाटले गेले, विरोधी पक्षानं हा बॉम्ब फोडला, हा काय लवंगी फटाका झाला का?" असंही राऊत म्हणाले. "देवेंद्र फडणवीसांनी आपला लढण्याचा पूर्वेतिहास विसरू नये. भविष्यात त्यांना पुन्हा या लढ्यासाठी उतरावंच लागणार आहे. कारण या भ्रष्ट सरकारचं ओझं घेऊन त्याना फार काळ राज्य करता येणार नाहीये", असं संजय राऊत म्हणाले. "फडणवीसांची काहीतरी मजबुरी आहे" दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकारण सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवर संजय राऊतांनी टीकास्र सोडलं. "ही सारवासारव आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचं काम फडणवीस मनापासून करत असतील, असं मला वाटत नाही. त्यांची काहीतरी मजबुरी आहे. त्यांच्यावर हे लादलेलं सरकार आहे. आम्हाला फडणवीसांविषयी पूर्ण सहानुभूती आहे", असं राऊत म्हणाले.