Sanjay Gaikwad : शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. ‘महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाही’, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आमदार संजय गायकवाड काय म्हणाले?
“कमकुवत कोणीही नसतं, फक्त काम करण्याची आपआपली वेगळी पद्धत असते. एकनाथ शिंदे यांनी त्यांची काम करण्याची स्टाईल लोकांना दाखवून दिलेली आहे”, असं आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. दरम्यान,संजय गायकवाड यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, आमदार अर्जुन खोतकरांसह त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावर संजय गायकवाड यांनी म्हटलं की, “आम्हाला धमक्या येतात. जे समाजात चांगलं काम करतात, त्यांना धमक्या येतात. पोलीसवाले काही करू शकत नाहीत. माझ्या घरची गाडी उडवण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा पोलिसांकडून काय चौकशी झाली? काहीही चौकशी झाली नाही”, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं.
“महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नसेल. पोलीस खातं म्हणजे शासनाने कोणताही कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला. गुटखा बंदी केली की यांचा हप्ता वाढला, दारू बंदी केली की यांनी चालू करायची की लगेच त्यांचा हप्ता वाढला. राज्यातील आणि देशातील पोलिसांनी इमानदारीने काम जर केलं तर जगातील सर्व गुन्हेगारी समाप्त होऊ शकते. फक्त पोलिसांनी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे”, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
“आता एक बातमी अशी वाचली की एक पोलीसवाला चोरांचा मास्टरमाइंड निघाला. तसेच बुलढाण्यात दोन पोलीस कर्मचारी असे होते की, त्यांची चोरांच्याबरोबर भागेदारी होती. त्या चोरांना पकडायला गेलं की हे आधीच त्यांना फोन करायचे, एवढंच नाही तर त्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा, आता मी त्यांचं नाव सांगणार नाही. राज्यातील पोलिसांनी कधी खरंच इमानदारीने काम केलं तर सर्वजण सुतासारखे सरळ होतील, गुन्हेगारी संपेल”, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.