मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतरच नाराजी नाट्य सुरु असतानाच आता शिवसेनेनं या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. शिंदे गटातील प्रत्येकाला मंत्रीपद हवं आहे त्यामुळे हे खातेवाटप म्हणजे बारा भानगडी असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. कोणतीही भानगड खपवून घेतली जाणार नाही, हे शिंदेंनी आमदारांना सांगणे हा विरोधाभास आहे असा शाब्दिक चिमटाही शिवसेनेनं काढला आहे. संपूर्ण शिंदे गटाची निर्मितीच भानगडीतून झाली असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. सध्याच्या भानगडी पाहता शिंदे गटाने स्वाभिमान आणि हिंदुत्वासाठी पक्ष सोडल्याचे दावे खोटे असल्याचा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

नक्की पाहा >> “काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अद्यापही सत्तेत असतो, तर…”, CM शिंदेंचं मोठं विधान; अमित शाहांनी विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नाबद्दलही केला खुलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खातेवाटपही अगदी नमुनेदार
“महाराष्ट्राच्या नशिबी जे भोग सध्या आले आहेत त्यातून मार्ग कसा काढावा याच विवंचनेत मऱ्हाटी जनता आहे. ‘ईडी-पिडी’ बळाचा वापर करून राज्याच्या मानेवर चाळीस पिंपळांवरचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहावे तर राज्यात एक नवी भानगड झालेली दिसते. यापैकी एकाही भानगडीशी शिवसेनेचा संबंध नाही. ३८ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले. खातेवाटपही अगदी नमुनेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरूनही एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तरच नवल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

शिरसाट-गोगावले अशा गट निष्ठावंतांचे वांधेच
“नगर विकासचे मलिदा खाते सोडले तर शिंदे गटाच्या हाती भाजपाने भोपळाच दिला आहे. सगळी प्रमुख खाती फडणवीस व त्यांच्याच लोकांच्या मुठीत. त्यामुळे नाक मुठीत धरूनच ‘त्या’ ५० जणांना फडणवीसांकडे जावे लागेल, पण खोक्यांखाली स्वाभिमान चिरडून गेला असल्याने हे सर्व ते सहन करतील! शिंदे म्हणून जो काही एक गट निर्माण झाला त्यातील काही लोकांना मंत्रीपदे मिळाली. यावर उरलेल्यांनी लगेच नाराजी व्यक्त करून मंत्रीपदाच्या इच्छा जाहीर केल्या. शिंदे गटाचे संभाजीनगरचे आमदार शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली. ‘‘मला कॅबिनेट मंत्रीपद आणि संभाजीनगरचे पालक मंत्रीपद हवे म्हणजे हवेच!’’ काल-परवा आलेल्या टोपी फिरवू दीपक केसरकरांना मंत्रीपद मिळते, मग आम्हाला का नाही? असे शिरसाट म्हणतात. यावर केसरकर ‘हपापाचा माल वाटपा’चे मालक असल्यासारखे आश्वासन देतात, ‘‘शिरसाटांनाही पुढच्या विस्तारात नक्कीच मंत्रीपद मिळेल!’’ केसरकर, सामंत यांच्यासारखे अनेक राजकीय बाहेरख्याली कधी इथे तर कधी तिथे व कुठेच जमले नाही तर शिंदे गटाच्या गुळास जाऊन चिकटत असतात. त्यामुळे शिरसाट-गोगावले अशा गट निष्ठावंतांचे वांधेच झाले म्हणायचे,” अशी टीका शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे.

नक्की वाचा >> सर्व प्रभावी, मलईदार खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले, “खातं कोणतं…”

पाकळी कोणाला व उरलेले काटे कोणाला मिळणार?
“शिरसाट या भानगडीत इतके बावचळले की, त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर उद्धव ठाकरे हेच कुटुंबप्रमुख असल्याचे जाहीर केले व नंतर सारवासारव करीत हा आमचा टेक्निकल लोचा असल्याचे सांगितले. मात्र शिरसाट यांनी शिंदे यांच्या गटातील ५० जणांची ‘खदखद’च एकप्रकारे व्यक्त केली. प्रत्येकाला काही ना काही तरी मिळायलाच हवे अशी शिंदे गटातील सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आता या पन्नास जणांना काही ना काही हवे म्हणजे काय? फूल ना फुलाची पाकळी तरी म्हणे आपल्याला मिळावी, असे ते म्हणत आहेत. मग आता यातील फुले कोणास? पाकळी कोणाला व उरलेले काटे कोणाला मिळणार? हे प्रश्न आहेतच,” असंही या लेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मंत्रीमंडळ विस्तार : ‘तुम्हाला काही फोन वगैरे आलेला का?’ असं विचारलं असता पंकजा मुंडे हसून म्हणाल्या, “…मी त्याला पकडते”

संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले, तेथे…
“या पन्नास जणांना ‘खोकी खोकी’ भरून मध तर आधीच मिळाला आहे, पण नुसती मधात बोटे बुडवून आणि चाटून काय होणार? आता मंत्रीपद हवेच. निदान महामंडळांचा बार तरी उडवाच. नाही तर या क्रांतीचा फायदा नाही, असे शिंदे गटाचे लोक उघडपणे बोलू लागले. पुन्हा ही पहिल्या विस्तारानंतरची भानगड आहे. दुसऱ्या विस्तारानंतर शिंदेंच्या गावात व गटात रोज बारा भानगडींना तोंड फुटेल व प्रत्येक भानगडबाजास खोकीवाटप करताना केस-दाढी गळून जाईल. शिंदे गटाचे मंत्री जिथे जातील तिथे निदर्शने होत आहेत. संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले. तेथे ट्रकभर फुले त्यांच्यावर उधळण्यात आली. त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असावी. पण सरकारच जर बारा भानगडी व लफडी करून आले असेल तर त्या अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण?” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

नक्की पाहा >> संजय राठोडांचा एकेरी उल्लेख करत पूजा चव्हाणच्या आजीची शिंदे सरकावर टीका; म्हणाल्या, “पोलीस क्लीन चीट देऊ शकतात पण तो…”

तो प्रयत्न या ‘प्रति-शिवसेना भवन’वाल्यांनी करू नये
“मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणे त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना बोलावून समज दिली की, वेडीवाकडी कामे करू नका. असे काही केलेत तर पाठीशी घालणार नाही. कोणतीही भानगड खपवून घेतली जाणार नाही. हे शिंदे यांनी सांगावे? कमाल आहे! मुळात स्वतः शिंदे व त्यांचा गट हीच एक भानगड आहे. प्रत्येकाला लालूच दाखवून फोडले आहे. पैसा, लाभाची पदे व ईडीचा धाक यातून हे शिंदे गटाचे भानगडबाज सरकार आले. आता या गटास सांभाळण्यासाठीही भानगडींचाच आश्रय त्यांना घ्यावा लागेल. आता म्हणे हे गटवाले मुंबईत व अनेक ठिकाणी प्रति-शिवसेना भवन उभारणार. त्या प्रति-शिवसेना भवनात शिंदे गटाचे शेणापती जाऊन बसणार. म्हणजे हे लोक आता प्रतिसृष्टी उभी करण्याची भानगड करू लागले आहेत. पुराणात देवादिकांना आव्हान देत कोणी तरी प्रतिसृष्टी निर्माण करण्याची भानगड केली होती. त्या प्रतिसृष्टीचे पुढे काय झाले, याची माहिती दादरच्या सदोबा हगवणकराने घ्यावी. काहींनी प्रतिपंढरी, प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे निर्माण करून तुंबड्या भरल्या, पण श्रद्धेचे व निष्ठेचे स्थान एकच असते. शिवसेनेच्या बाबतीत तर तेच प्रखर सत्य आहे. तेव्हा या सत्याच्या प्रखर तेजाकडे बघण्याचा प्रयत्न या ‘प्रति-शिवसेना भवन’वाल्यांनी करू नये,” असा इशाराच शिवसेनेनं दिला आहे.

नक्की पाहा >> Photos: “…तर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी”; देवेंद्र फडणवीस मंचावर असतानाच नितीन गडकरींचं सूचक विधान

शिवसेना भवन बारा भानगडीतून निर्माण झालेला अड्डा नाही तर…
“पुन्हा आताच तुमच्या गटातील भानगडींना तोंड देताना तुमच्या तोंडाला फेस येत आहे. त्यात प्रति-शिवसेना भवनातील नव्या भानगडींचे निवारण करण्याची नसती आफत सांभाळता सांभाळता तुम्हाला मुश्कील व्हायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. ५६ वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे. ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो! बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदे रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले; बंगल्यातून बाहेर पडताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “अरे बाबा…”

एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो…
“शिवसैनिक स्वाभिमानाची मीठ-भाकरी खातो, पण महाराष्ट्राशी बेइमानी करणार नाही. भारतीय जनता पक्षाला मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवायचा आहे. मराठी माणसाला गुलाम-लाचार करून मुंबई गिळायची आहे व त्याकामी शिंदे गटाची भानगड त्यांनी निर्माण केली. ही बाब गंभीर आहे. शिंदे गटाच्या भानगडीस संजय शिरसाट यांनी तोंड फोडले. ‘ह्योच नवरा पायजे’च्या तालावर ते म्हणाले, ‘‘मंत्रीपद आता हवेच.’’ पन्नास जणांना हवे म्हणजे हवेच. चला, या निमित्ताने एक जळजळीत सत्य बाहेर आले. शिंदे गटाने शिवसेना सोडताना स्वाभिमान, हिंदुत्व वगैरेंचा जो मुद्दा समोर आणला तो सपशेल झूठ आहे. जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति-शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करू शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे?” असा शाब्दिक चिमटाही शिवसेनेनं शिंदे गटाला काढलाय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena slams eknath shinde group over cabinet expansion scsg
First published on: 16-08-2022 at 08:03 IST