मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी काँग्रेसने प्रतिक्रिया नोंदवली आहे. काँग्रेसच्या आमदार तसेच अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संतोष बांगर यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा लोक संतापाचा उद्रेक होता असं म्हटलं आहे. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी बांगर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याने रविवारी सायंकाळी अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं.

शिवसेनेमधून बंडखोरी करणाऱ्या ४० आमदारांपैकी शेवटचे आणि अगदी नाट्यमयरित्या शिंदे गटात गेलेले आमदार म्हणून संतोष बांगर यांची ओळख आहे. रविवारी सायंकाळी अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी येथील मठातून दर्शन करून निघालेल्या बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. बांगर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा देत शिवसैनिकांनी बांगर यांच्या गाडीवर हल्ला चढवला. हाताने गाडीच्या खिडक्यांवर मारत गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.

आमदार संतोष बांगरांकडून हिंगोलीतील प्राचार्यांना मारहाण; दीपक केसरकर म्हणाले, “बांगर साहेबांनी आता…”

याच प्रकरणासंदर्भात भाष्य करताना स्थानिक आमदार यशोमती ठाकूर यांनी बांगर हे आदल्या दिवसापर्यंत ठाकरेंना साथ दिली नंतर शिंदे गटात गेले असं नमूद करत आपलं मत मांडलं. पत्रकारांनी माजी पालमंत्री असणाऱ्या ठाकूर यांना त्यांच्याच जिल्ह्यात झालेल्या या हल्लासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “आता असं आहे की ही मंडळी आहेत जी पैसे घेऊन निघून गेले. संजय बांगरने तर अतिशय चुकीचं कृत्य केलं होतं. आदल्या दिवशी ते ठाकरेंसाहेबांबरोबर होते. दुसऱ्या दिवशी त्यांना काय आमिष दिलं गेलं ते कसे गेले हे त्यांचं त्यांना माहिती,” असं म्हणत आपलं मत मांडलं.

बांगर यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या ताफातील गाड्यांवर शिवसैनिकांनी हाथबुक्क्यांनी मारुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला याबद्दल बोलताना ठाकूर यांनी, “हा लोकांचा रोष आहे. पण लोकांनी मानहानी करु नये एवढंच मी सांगेन. पण लोकांचा रोष आहे तो आपण थांबवू तरी कसा शकतो?” असा प्रतिप्रश्न विचारला.

“…अन्यथा रट्टे देईन”, संतोष बांगर यांची पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला दमदाटी

अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना रविवारी सकाळीच लागलेली. दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’चे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी मारत घोषणाबाजी केली.