एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकलं आहे असं ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावर बोलताना विनायक राऊत यांनी ही टीका केली. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘एकनाथ शिंदेंना आमदार केल्याचा मला पश्चाताप’

“ठाणे शहराचा संपर्कप्रमुख असताना मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं,” असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलं आहे.

‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “रिक्षाने मर्सिडीजला…”

काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहीत नाही ; एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा टोला

“आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंवर आरोप”

“संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार होती तर तुम्ही बैठकीत, चर्चेत हा मुद्दा मांडायला हवा होता. आता केलेल्या गद्दारीचं खापर शंभूराजे देसाई संजय राऊत यांच्यावर फोडत आहेत. उद्धव ठाकरे तुम्हाला सतत आवाहन करत असताना तुम्ही परत का आला नाहीत?,” अशी विचारणा विनायक राऊत यांनी केली. उद्धव ठाकरेंनी शेवटच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांची नावं बदलली हे हिंदुत्वाचं प्रतिक नाही का? अशी विचारणाही त्यांनी केली. आता आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंवर आरोप केले जात आहेत असं ते म्हणाले.

“उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

“धनुष्यबाण गुलाबराव यांच्या बापजादाने निर्माण केलेलं नाही”

“धनुष्यबाण गुलाबराव यांच्या बापजादाने निर्माण केलेलं नाही. आमच्या बापाने केलं आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. तुम्हाला नैतिक अधिकार नाही. हिंमत असेल तर आम्ही शिवसेना सोडली जाहीर करा,” असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलं.

शिंदे गटाकडून शिवसेनेतील आमदार, खासदार संपर्क असल्याच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी मी आमदार, खासदार कोणावरही जबरदस्ती करणार नाही सांगितलं आहे. मनापासून आहेत त्यांनीच सोबत राहा, चुकत असेल किंवा दुसरीकडे उज्वल भविष्य आहे असं वाटत असेल तर जरुरा जा असं ते म्हणाल आहेत. इतक्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लाभल्याचा अभिमान आहे”.