राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार आज पार पडणार असून पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ३९ दिवसांपासून राज्याचं मंत्रालय सचिवालय झालं आहे, आज तरी ते मंत्रालय व्हावे अशी इच्छा आहे असा टोला एबीपी माझाशी बोलताना लगावला आहे. ज्यांना मंत्रिमंडळात तात्पुरती संधी मिळेल ती लखलाभ असो असंही ते म्हणाले आहेत.

“४० जणांना मंत्रीपदाचं आमिष दाखवून शिवसेनेपासून दूर घेऊन गेले आहेत. त्याच्यापैकी ८-१० जणांचा नंबर लागेल. इतर जण एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले आहेत. त्यामुळेच पाय खेचणं सुरु झालं आहे. काहीजण आमच्या संपर्कात येण्यास सुरुवात झाली आहे,” असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

मंत्रिमंडळाचा आज विस्तार ; पहिल्या टप्प्यात भाजप-शिंदे गटातील २० ते २२ जणांना संधी

“संपर्कात असले तरी आम्ही कोणावारही दबाव टाकलेला नाही. आमच्याकडे पुन्हा येण्यासाठी त्यांना कोणतंही आमिष दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही. ज्यांना मनापासून जायचं आहे ते गेले असल्याने जास्त मनधरणी करायची नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नितीन देशमुख, कैलास पाटील यांच्याप्रमाणे ज्यांना वाटत असेल, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत,” असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

“या सरकारला भविष्य नाही. सुप्रीम कोर्टात अपात्रतेसंदर्भात जे प्रकरण आहे, त्यामध्ये आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. देशातील सर्व कायदेतज्ज्ञ हेच सांगत आहेत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.

भाजपला २४तर शिंदे गटाला १८ मंत्रिपदे?

* सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापुढील कायदेशीर प्रश्न संपुष्टात येईपर्यंत मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार करू नये, असे भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरविले आहे.

* त्यामुळे पहिल्या टप्प्यात भाजपच्या १२-१३ आणि शिंदे गटाच्या ९-१० मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वाटय़ाला एकूण २४ तर शिंदे गटाला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

* पण, मंगळवारच्या विस्तारानंतर काही महिन्यांनी उर्वरित जागा भरल्या जातील. तोपर्यंत भाजपा आणि विशेषत: शिंदे गटातील इच्छुकांना मंत्रिपदाच्या आशेवर ठेवण्यात येईल, असे दिसते.