मुंबईच्या वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश वरळीतील शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यावर हा शिवसेनेला धक्का नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचे पेडणेकर यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. जो धक्का आहे त्यांची नाव आम्ही किनाऱ्यावर लावत आहोत, असा सूचक इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरळीतील शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश, बालेकिल्ल्यातच कार्यकर्त्यांनी साथ सोडली

“कोस्टल रोडसंदर्भात कोळी बांधवांना काही आक्षेप आहेत. त्यांना वाटतं की शिंदे सरकारमध्ये त्यांच्या समस्या सुटतील, म्हणून ते शिंदे गटात गेले आहेत. त्यात धक्का कसला? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे. आम्हालाही बघायचं आहे आकाशातील चंद्र ते कसे देतात, असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिले आहे. कोळी बांधवांच्या प्रश्नांबाबत आदित्य ठाकरेंनी अनेकदा बैठक घेतली होती. याबाबत काही निर्णयही झाले होते. मात्र, आता या संधीचा भाजपाचे काही लोक फायदा घेत आहेत, असा आरोप पेडणेकरांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणतात…

दरम्यान, शिंदे गटात प्रवेश केलेल्या वरळीतीत शिवसैनिकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. “मी एक सामान्य नागरिक आहे. सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाल्याची लोकांची भावना आहे. त्यांना वाटतंय की हे सरकार न्याय देईल”, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे. “जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाऊया” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. दसरा मेळाव्याच्या काही दिवसांआधीच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळीतील कार्यकर्त्यांनी साथ सोडली आहे. “आदित्य ठाकरेंना मिळणाऱ्या धक्क्यांची ही सुरुवात आहे. यानंतर त्यांना आणखी मोठमोठे धक्के बसतील”, असा इशारा शिंदे गटातील नेते किरण पावसकर यांनी दिला आहे.