सावंतवाडी: आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. तेथे अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १०२ नागरिकांची माहिती प्रशासनाने संकलित केली असून ती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या १०२ नावांपैकी ११ नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. या ११ जणांच्या नावांची स्वतंत्र यादी तयार करून ती पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. महसूल आणि पोलीस विभागामार्फत तालुका व जिल्हा स्तरावर ही माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मदतीसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित:
आखाती देशात अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत आणि माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. नागरिकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा:
- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग: (०२३६२) २२८८४७ / १०७७
- पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग: (०२३६२) २२८६१४
जिल्हा प्रशासन या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून केंद्र व राज्य शासनाशी सतत समन्वय साधला जात आहे. “नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क ठेवावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
