सावंतवाडी: निसर्गाचा लहरीपणा आणि हवामान बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. बागायतदारांचे जवळपास ८५ टक्के नुकसान झाले असून, या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यातील ३४,२९६ हेक्टर आंबा क्षेत्राला हवामान बदल आणि कीडरोगाचा विळखा बसला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) या संस्थेच्या मदतीने नवीन प्रणाली विकसित केली जाणार आहे. यात प्रत्येक झाडाचे सूक्ष्म निरीक्षण आणि दर ५०० मीटरवर अचूक हवामान देणारी यंत्रणा कार्यान्वित होईल. यासाठी प्रति हेक्टर ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, जिल्हा नियोजन समितीमार्फत साडेचार कोटींचा निधी दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
संशोधन केंद्राच्या कारभारावर ताशेरे
यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा संशोधन केंद्राच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकार पगार देते, पण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच, जिल्ह्यात लवकरच एआय तंत्रज्ञानयुक्त लॅब उभारण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी सूचना केल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजकारण नको, संवाद हवा!
”आंबा उत्पादक शेतकरी स्वाभिमानी आहे, तो सहजासहजी हात पसरत नाही. मात्र, आज परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळी राजकारण किंवा आंदोलनापेक्षा संवादातून मार्ग काढूया. ज्यांचे पंचनामे झाले नसतील, त्यांनी तत्काळ माहिती द्यावी,” असे आवाहन नितेश राणे यांनी केले. आखाती देशांतील युद्धाचा परिणाम बाजारपेठेवर होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.
देवगडमध्ये बागांची प्रत्यक्ष पाहणी
पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “नुकसान भरपाईची घोषणा लवकरच केली जाईल. शासन बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.” या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नारनवरे उपस्थित होते.
नुकसान भरपाई बाबत ते म्हणाले,८५ टक्के नुकसानीसाठी शासनाकडून लवकरच मदतीची घोषणा केली जाईल. ५०० मीटरच्या अंतरावर मिळणार अचूक हवामान अंदाज मिळेल असा प्रयत्न करणार आहे.
कीड आणि रोगावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, तर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडून साडेचार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे असे पालकमंत्री नितेश राणे यांनी बोलताना सांगितले.
देवगड येथील बागायती मध्ये भेट दिली तेव्हा जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, माजी आमदार अजित गोगटे आदी उपस्थित होते.
