सावंतवाडी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील २६ ठिकाणांचा यात समावेश असून, आज बुधवार, दि. ७ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल आणि रात्री ८ वाजता ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी याबाबतची आढावा बैठक देखील पार पडली. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात येत आहे. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाने कोणती पाऊले उचलावी, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात आज दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल होईल. ज्या ठिकाणी सायरनची व्यवस्था आहे (मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र), तेथे ठीक ४ वाजता २ मिनिटांसाठी सायरन चढ-उताराच्या स्वरूपात वाजेल. सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी स्वतः सुरक्षित स्थळी जावे. ४.१८ मिनिटांनी १ मिनिटांसाठी शेवटचा सायरन वाजेल, त्यानंतर मॉक ड्रिल संपेल. या दरम्यान आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलिस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणा मदतीसाठी सज्ज असतील. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी आणि ज्या बँकांमध्ये सायरनची सुविधा आहे, अशा ठिकाणी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सायरनबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी सांगितले की, या मॉक ड्रिलदरम्यान सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या मॉक ड्रिलमध्ये स्वयंसेवक, एनसीसी, एनएसएस आणि अशासकीय संस्थांची (एनजीओ) मदत घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनांतर्गत नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, मॉक ड्रिलनंतर कार्यवाहीचा अहवाल सादर केला जाईल.
रात्री ८ ते ८.१५ दरम्यान देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. या पंधरा मिनिटांत या परिसरातील वीज पूर्णपणे बंद ठेवली जाईल, जेणेकरून शत्रूंना किंवा विमानांना लक्ष्य दिसू नये. या काळात नागरिकांनी शक्यतोवर प्रकाश होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास वाहने जागेवरच थांबवावीत किंवा कमी प्रकाशात चालवावीत, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी नागरिकांना या काळात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.