सोलापूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून बिनतोड जबाब दिल्याबद्दल सोलापुरात विविध राजकीय व सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी जल्लोष करीत भारतीय लष्कराबद्दल अभिमान बाळगला. या जल्लोषातून एकतेचे दर्शन घडले. मात्र ‘ऑपरेशन जल्लोष’ आणखी परिणामकारक व्हावा, पाकव्याप्त काश्मीर कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यावे, अशी अपेक्षा सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त करण्यात आली.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शहर व जिल्हा शाखेतर्फे मंगळवार पेठ पोलीस चौकीसमोर जल्लोष करण्यात आला. यावेळी भारतीय लष्करप्रमुख मुनीर व पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या प्रतिमांसह पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून पाक विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शहरप्रमुख महेश धाराशिवकर व उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या जल्लोषात जिल्हा समन्वयक संताजी भोळे, लहू गायकवाड, विजय पुकाळे, उज्ज्वल दीक्षित, योगेश कंठीकर, दिनेश हंचाटे आदींनी उत्साही सहभाग नोंदविला होता. सून ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्थान, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या धुरंधर नेतृत्वाचे अभिनंदन करीत भारतीय लष्कराच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. पाकिस्तानने गेल्या ७० वर्षांत भारताविरुद्ध वेळोवेळी कुरापती काढल्या. दहशतवादी हल्ले चढविले. भारताने त्या त्या वेळी बिनतोड प्रत्युत्तर दिले. परंतु आता पाकिस्तानरूपी विषारी सापाचे मुंडके पूर्णपणे ठेचण्याची आणि पाकिस्तानचा कायमचा बिमोड करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व यात शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला. आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. या शौर्यगाथेबद्दल भारतीय लष्कराचे अभिनंदन, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी ब्रिगेड संघटनेचे शहरप्रमुख मतीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. शास्त्रीनगराजवळील मौलाली चौकात काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या अधिपत्याखाली मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन भारतीय लष्कराच्या कारवाईचे स्वागत केले. यावेळी एकमेकांना लाडू भरविण्यात आले.’ऑपरेशन सिंदूर ‘ च्या माध्यमातून भारतीय सशस्त्र लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर तुफानी मारा करून पाकिस्तानला जोरदार धडा शिकविल्याबद्दल समाज माध्यमांतूनही नागरिकांनी आनंद व्यक्त केला. पाकिस्तानच्या विरोधात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. पाकिस्तानवर आता अर्धवट लष्करी कारवाई करू नये, अन्यथा पुढील काळात पाक पुरस्कृत दहशतवाद पुन्हा तोंड वर काढेल, असा सावधानतेचा इशारा देताना, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे, अशी अपेक्षा सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त करण्यात आली.