आंध्र प्रदेशमधील तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन परत येताना सोलापुरातील भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जणांचा मृत्यू, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. तिरूपतीच्या जवळ चंद्रगिरीनजीक मंगळवारी ( २५ जानेवारी ) सायंकाळी कार रस्तामधील दुभाजकाला आदळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील सर्व मृत आणि जखमी जुळे सोलापुरातील राहणारे आहेत. अद्याप मृत आणि जखमींची नावे अधिकृतपणे समोर आली नाही. सर्व ९ जण एमएच १३ पीएच ९७०१ या क्रमांकाच्या तवेरा कारमधून तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर हे सर्वजण सोलापूरकडे निघाले होते. हेही वाचा : “शरद पवार आजही भाजपाबरोबर”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “अजित पवारांनी…” पण, तिरुपतीच्या बाहेर आल्यावर चंद्रगिरी तालुक्यात नायडूपेट-पूथलापट्टू रस्त्यावर तवेरा कार अचानकपणे दुभाजकावर जाऊन आदळली. कारचा वेग जास्त असल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक पोलिसांनी नजीकच्या रूग्णालयात दाखल केलं आहे.