सोलापूर : कालानुरूप घडलेल्या सामाजिक बदलांमुळे मुलांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्याही पुढे झेप घेऊन मुलींची वाटचाल सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही मागील पाच वर्षांत हे आश्वासक चित्र पाहायला मिळते. देशात शंभर वर्षांपूर्वी महिलांना दुय्यम स्थान तर होतेच, शिवाय शिक्षणाचे धडेही त्यांना दिले जात नव्हते. क्रांतिज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. प्रतिकूल परिस्थितीत टप्प्या-टप्प्याने महिला शिक्षण घेऊन पुढे येत राहिल्या. अलीकडे तर संपूर्ण जगात कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांची नावे सर्व परिचित झाली आहेत. शिक्षणात तर महिलांची झेप सुरूच आहे. मागील पाच वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांपेक्षा मुलींनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतला आहे. यात २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात एकूण २६९५ मुले तर २८७९ मुलींनी यशस्वी पद्धतीने उच्चशिक्षण घेतले आहे. १८४ संख्येने मुलींची संख्या अधिक आहे. जागतिक महिला दिन साजरा होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला हे सकारात्मक आणि आश्वासक चित्र समोर आहे. विशेषत: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र आदी महत्त्वाच्या पदव्युत्तर ज्ञानशाखांकडे मुलींचा ओढा वाढला आहे. शिक्षणाच्या जोरावर महिला प्रगती करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आज अंगणवाडी शिक्षिकेपासून ते पायलट आणि देशाच्या अर्थमंत्र्यापर्यंतची जबाबदारी समर्थ आणि सक्षमपणे महिला सांभाळत आहेत. महिलांना अधिक प्रमाणात उच्चपदांवर येण्याची गरज आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांची कामगिरी अभिमानास्पद आहे. अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. महिला या धाडसी असतात. व्यवस्थापनाचे धडे त्यांना कुटुंबातूनच मिळतात. त्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य चांगले असते. महिलांनी उराशी स्वप्न व ध्येय बाळगून त्यासंदर्भात शिक्षण घेत प्रगती साधावी, अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.