आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी प्रथमच सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य केले. सोलापुरातून सकाळी वेळेवर निघालेली वांदे भारत एक्सप्रेस मुंबईत पाच मिनिटे लवकर पोहोचली. गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर प्रथमच या वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य करताना आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात नाव कोरले. त्याबद्दल मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटी) लोको पायलट सुरेखा यादव यांचा सत्कार करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी धन्यता मानली. मूळच्या सातारा येथील सुरेखा यादव १९८८ साली भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.