सांगली : दोन दिवसांपूर्वी डोक्यावर अक्षता पडल्या. लग्नाची हळद अजूनही ओली आहे. तरीही संदेश येताच सांगलीतील जवान सीमेवर शनिवारी रवाना झाला, तर सिद्धेवाडीतील जवान मुलाचे बारसे घरच्यांना करण्यास सांगून मायभूमीच्या रक्षणासाठी रवाना झाला.भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून, सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत. अशा स्थितीत नैमित्तिक सुटीवर आलेल्या जवानांना कर्तव्यावर हजर होण्याचा संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होत आहे. या संदेशानुसार अनेक सैनिक सुटीवर असतानाही सीमेवर जात आहेत.
सांगलीत वास्तव्यास असलेले, पण मूळचे कोळे (ता. सांगोला) येथील योगेश अलदार हे त्यांच्या विवाहासाठी ३० एप्रिल रोजी ४० दिवसांच्या सुटीसाठी आले होते. या कालावधीत बाज येथील मुलीशी ५ मे रोजी त्यांचा विवाह पार पडला. आणि ७ मे रोजी त्यांना संदेश आला. ते राजस्थानातील गंगानगरमध्ये रणगाडा विभागात कार्यरत असून, त्यांना तातडीने कर्तव्यावर हजर होण्याचा आदेश मिळताच त्यांनी शनिवारी रेल्वेने कर्तव्यस्थळी कूच केले आहे.
सिद्धेवाडी येथील जवान रुपेश ऊर्फ बाळू शेळके हेही तीन महिन्यांच्या बाळाचे बारसे करण्यासाठी एक महिन्याच्या सुटीवर आले होते. मुलाच्या बारशासाठी पै-पाहुणे घरी जमले होते. दि. ८ मे रोजी बारशाचा कार्यक्रम होता. आणि त्याच दिवशी त्यांना सैन्यदलाकडून कर्तव्यावर हजर होण्याचा संदेश प्राप्त झाला. आई लक्ष्मीबाई, पत्नी रुपाली, बंधू अमोल शेळके यांचा निरोप घेत मुलाच्या बारशाचा कार्यक्रम अर्धवट सोडून ते देशसेवेसाठी रवाना झाले.
दरम्यान खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्रज्वल रुपनूर हा जवान आज सीमारक्षणाच्या कर्तव्यासाठी मिरज स्थानकावरुन गुजरातला रवाना झाला. पंधरा दिवसापुर्वीच त्याचे लग्न झाले असून कर्तव्यावर हजर होण्याचा संदेश मिळताच तो रवाना झाला. मिरज स्थानकावर मुस्लिम बांधवांनी त्याच्यावर गुलाब पाकळ्यांची उधळण करत भारत जिंदाबादच्या घोषणा देत शुभेच्छा दिल्या. घराण्यातील तिसऱ्या पिढीचे सैन्यदलात प्रतिनिधीत्व करत असल्याचे रुपनूर यांने सांगितले.