निळवंडे प्रश्नी काही मंडळी राजकारण करतात. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. निळवंडेचे पाणी लवकर मिळावे म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी मैत्री करतो, पण काहींना आमची मैत्री आवडत नसल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्री गणेश कारखान्याच्या ५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ना. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ होते. तर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुजय विखे पाटील, पोपटराव लाटे, रावसाहेब देशमुख, शिवाजी वाघ, भागवतराव ढोकचौळे, शांतीनाथ आहेर, नंदूशेठ राठी, सुभाषराव गमे, वाल्मुक गोर्डे, राजेंद्र लहारे, डॉ.धनंजय धनवटे, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे यांच्यासह सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील कारखान्याने ‘गणेश’ चालविण्यास घेतला. त्यामुळे विखे पाटील कारखान्याच्या ताळेबंदात गणेशचा तोटा दिसतो. प्रवरेचे विरोधक पत्रक काढून गणेश कारखान्यास भाकड गाय म्हणातात. ज्यांनी दूध संस्था बंद पाडल्या त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. पद्मश्रींनी सहकाराचा पाया घातला. आम्ही त्याचे पावित्र्य जपले. गणेश बंद पडून नये, सामाजिक दायित्व म्हणून चालिवण्यास घेतला. गणेशचा ७१ कोटी रुपयांचा तोटा आम्ही भरून काढू. मागील सरकारमध्ये जलसंपदामंत्रिपद कोणाकडे होते..?  त्या वेळी निधी का आणला नाही. आपण मात्र सरकार कोणतेही असो पाठपुरावा चालूच ठेवणार आहोत. या भागाला पाणी मिळवून देऊ, सामान्य लोकांचे भले कसे होईल, त्यांना न्याय कसा मिळेल यास आपले प्राध्यान्य असल्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. गणेश कारखान्याला पुनर्रवैभव प्राप्त करून देऊ, सभासद तसेच कामगारांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. प्रवरेचा धाकटा भाऊ म्हणून गणेशचे संगोपन करू.गणेश कारखान्याच्या ७१ कोटींची जबाबदारी विखे पाटील कारखान्याने घेतली आहे. या गळीत हंगामात गणेश कारखाना ४ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. ऊस विकासाच्या योजना विखे पाटील कारखान्याप्रमाणेच गणेशमध्ये राबविणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.