राज्यातील करोना रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ४० हजारांच्या वर असणाऱ्या रुग्णसंख्येत काहीशी घट झालेली दिसून आली. गेल्या २४ तासात राज्यात ३९,२०७ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात३८,८२४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आत्तापर्यंत राज्यात १, ८६० ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत, त्यापैकी १,००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.




हेही वाचा – Covid Vaccination : १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरणाबाबत समोर आली नवीन माहिती
राज्यात आज ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.९५ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के आहे. सध्या राज्यात २३ लाख ४४ हजार ९१९ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर २९६० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
मुंबईत सोमवारी ५,५५६ नवे करोना बाधित आढळले होते पण आज मात्र ६,१४९ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी ६,१४९ नवे रुग्ण आढळले असून ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १६,४७६ झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रुग्ण म्हणजेच १२,८१० जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्के आहे..