“राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे.” अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, “मुंबईत बलात्कार झालेल्या महिलेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुंबईमधील महिला आज भयभीत आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर अनेक लोकं राहत असून सुरक्षित होतं. आज त्या प्रतिमेला तडा लागला आहे. त्यांना सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. कारण, मागील काही दिवसात मोठ्याप्रमाणावर अशा प्रकारच्या संख्या घडल्या आहेत. पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत, याचा अर्थ सरकाचं लक्ष नाही. पोलिसांवर नियंत्रण नाही. पोलिसांना योग्य मार्गदर्शन नाही.”

तसेच, “तुमचा प्राधान्यक्रम बदलला आहे. तुमचा प्राधान्यक्रम बदल्या, वाझे सारख्या प्रवृत्तींना पाठीशी घालणे. म्हणून आज आपलं स्कॉटलंडच्या तुलनेत असलेला पोलीस विभाग सरकारच्या नाकर्तेपणामुळे बदनाम होत आहे. पोलीस सक्षम आहेत. हिंमतबाज आहेत परंतु जसा राजा तशी प्रजा, तसंच जसं सरकार तसं पोलीस खातं आणि त्याचा प्रत्यय तर आज अशा भयानक घटनामधून दिसत आहे.” असंही दरेकर यांन बोलून दाखवलं.

याचबरोबर, “तुमचं केवळ सरकार हेच प्राधान्य आहे का? शेवटी सरकार कशासाठी असतं. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी. जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही.” असा इशारा देखील दरेकर यांनी यावेळी दिला.