लोकसत्ता प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामातील अनियमितता आणि ६०० कोटीचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपा नंतर राज्य शासनाच्या बेलापूर येथील राज्य पाणी व स्वच्छता मिशनकडून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची चौकशी पुर्ण करण्यात आली आहे. या चार सदस्य असलेल्या समितीच्या अहवाला नंतरच जल जीवन मिशन योजनेच्या कामात खरोखर भ्रष्टाचार झाला की नाही हे उघड होणार आहे. ही चौकशी नेमलेल्या समितीकडून पुर्ण झाल्याचा दुजोरा जिल्हा परिषदेकडून देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामात सुमारे ६०० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते स्वप्नील खैर यांच्या तक्रारी वरुन करण्यात आला होता. त्यानुसार याप्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. बेलापूर येथील राज्य पाणी व स्वच्छता मिशनकडून १५ ते १६ एप्रिल रोजी ही चौकशी पुर्ण करण्यात आली आहे. या चौकशी नंतर समिती आपला अहवाल सादर करणार आहे. समितीच्या येणा-या अहवाला नुसार या जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार झाला आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनच्या कामां बाबत राज्य जल जीवन मिशन समिती कडून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची चौकशी झाली असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात सुरु असलेली जल जीवन मिशनच्या कामात अपू-या निधीमुळे अनियमितता आहे. मात्र या कामात भ्रष्टाचार झाला नसून आलेल्या चौकशी समितीला जिल्हा परिषदेकडून पुर्ण सहकार्य करण्यात आले आहे. मात्र समितीच्या अहवाला नंतरच या कामात खरोखर भ्रष्टाचार झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. -वैदही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद.