कराड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे जाणते अन् मोठे साहित्यिक. उत्कृष्ट राजकारणी असून, त्यांच्या वैचारिक चळवळीचा वारसा आजही जोपासला जातो. यशवंत विचारांचे हे धन नवोदित साहित्यिकांना प्राप्त व्हावे असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे येथे आयोजित ३१ व्या नवोदित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, पत्रकार विशाल पाटील, रवींद्र पाटील, हणमंत चिकणे, शुभांगी काळभोर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी यशवंतराव चव्हाण समाधी ते संमेलनस्थळ अशी दिंडी काढण्यात आली. संमेलनात अनेकांना पुरस्कारासह गौरवण्यात आले.
पाटील म्हणाले, महात्मा फुल्यांपासून अनेक विचारवंतांच्या वैचारिक चळवळीचा साक्षीदार म्हणून सातारा जिल्ह्याकडे पाहिले जाते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विचारांची एक चळवळ उभी केली. त्या चळवळीचा वारसा आजही जोपासला जातो. साहित्य संमेलनातही त्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जावा. नवोदित लेखकांनी त्याच विचारांतून अनेक गोष्टी स्वीकाराव्यात. तो वारसा समाजसेवेचा आहे, तो अधिक समृद्धपणे समाजासमोर मांडला जावा, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
संमेलनाचे उद्घाटक विशाल पाटील म्हणाले, साहित्यिक आणि पत्रकारांचे जवळचे नाते. पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडताना अनेक साहित्यकृती समोर येतात. शाळेतूनच साहित्यिक घडतात. त्यामुळे साहित्य व शाळेचा संबंध चांगला असतो. नवोदित लेखकांनी आपल्या विचारांना लेखणीतून मूर्तरूप द्यावे.
लक्ष्मण ढोबळे यांनी यशवंतराव चव्हाण हे साहित्यरत्न असल्याचे सांगून, त्यांनी अनेक काव्यपंक्तींद्वारे साहित्यकृतींना उजाळा दिला. अलीकडे वाचन संस्कृती फार कमी झाली. शेतकरी दूध काढताना एक सड वासरासाठी राखून ठेवतो. मात्र, सध्याचे राजकारणी, व्यवहारातले धंदेवाईक इतरांसाठी काहीही न ठेवता सर्वांची पिळवणूक करतात. साहित्य माणसाला मोठे करते. हल्ली देवळे जास्त बांधली जातात. पण, साहित्याची मंदिरे फार कमी उभारली जात असल्याने त्यांची निर्मिती व्हायला हवी अशी अपेक्षा ढोबळे यांनी व्यक्त केली.