लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड भेटीत शक्तिपीठ महामार्गाला मुठभर शेतकर्‍यांचा विरोध असून सर्व आमदारांचे या महामार्गाला समर्थन असल्याचे केलेले वक्तव्य महामार्ग विरोधात शेतकर्‍यांची वज्रमूठ भक्कम करणारे ठरले. यासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी येत्या २० तारखेला कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.

महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तिपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक वीस फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे अशी माहिती विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली आहे.

महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्या नंतर महायुती सरकार हे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. वेगवगेळे आराखडे तयार केले आहेत अशा बातम्या देखील सरकार फिरवत आहे. पण कोणतेही अधिकृत पेपर सर्क्युलर, नोटिफिकेशन सरकारकडून प्रसिद्ध होत नाही. हा महामार्ग करण्यासाठी ते खोट्या प्रचाराचा देखील आधार घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करत सांगितले की, या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे. खरे तर या विरोधात १२ पैकी दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी गेल्या फेब्रुवारी २०२४ पासून आंदोलन करत असून शेतकऱ्यांनी २४ जानेवारी रोजी एकाच दिवशी राज्यव्यापी धरणे आंदोलनमधून १० जिल्ह्यामधील संघटीत विरोधाचे संतप्त प्रदर्शन केले होते. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांना त्याचे गुप्तहेर खाते व पोलीस हे या सर्वांची माहिती देऊ शकतील तरीदेखील पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विपर्यास करुन शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे.

शक्तिपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे, पर्यावरणाचे, करदात्यांचे, जनतेचे सर्वांचेच नुकसान होणार आहे. पर्यायी महामार्ग असताना त्याचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत.

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्यात एकजूट घडवत आरपारची लढाई करण्याचा निर्धार केला असून यासाठी राजर्षि शाहू महाराजांच्या भूमीमध्ये २० फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तेथून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या व्यापक बैठकीस कोल्हापूर सहित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले आहे.

मराठवाड्यातील सहाही जिल्ह्यामधून या बैठकीस प्रतिनिधी उपस्थित राहाणार असल्याची माहिती शक्त्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार,सतीश कुलकर्णी, गजानन तिमेवार (नांदेड),गोविंदराव घाटोळ,विजय बेले (परभणी),धोंडीराम कल्याणकर,जनार्दन कर्‍हाळे (हिंगोली ),गजेंद्र येळकर,अनिल ब्याळे ( लातूर),अभिजित देशमुख,संभाजी फरताडे (धाराशिव),अॅड.अजय बुरांडे,लालासाहेब शिंदे ( बीड ) यांनी दिली आहे.

Story img Loader