राज्यातील शेती वगळता सर्व औद्योगिक घटकांचे वीज अनुदान स्थगित ठेवण्याचे निर्देश महावितरण कंपनीने दिले आहेत. याचा फटका राज्यातील मोठ्या औद्योगिक घटकाला बसणार असल्याने उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशांच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असल्याची चर्चा होत आहे. महावितरणकडून सवलतीच्या दरात काही घटकांना वीज पुरवठा करण्यात येतो. शेती हा त्यातील सर्वात मोठा भाग आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, ड आणि ड अधिक प्रक्षेत्र, वस्त्रोद्योग, यंत्रमाग हे औद्योगिक घटक सवलतीच्या वीज दराचे लाभार्थी आहेत. दरम्यान, आगामी सूचना मिळेपर्यंत या सर्व औद्योगिक घटकांची वीज सवलत स्थगित ठेवण्यात यावी, असा तातडीचा ई-मेल संदेश महावितरणचे मुख्य वाणिज्य अभियंता यांनी संबंधित अधिकारी व देयक विभागाला पाठवला आहे. १ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी हा संदेश पाठवण्यात आलेला आहे. या आदेशाची माहिती मिळाल्यानंतर उद्योजकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील २७ अश्वशक्तिहून अधिक वीज वापर करणाऱ्या यंत्रमागधारकांना सवलतीच्या दरातील वीजपुरवठा यापुढेही सुरू ठेवला जाईल, अशी घोषणा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी तीन आठवड्यांपूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच महावितरणने यंत्रमागसह सर्व औद्योगिक घटकांचा वीज सवलत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचा हा निर्णय उद्योजकांना धक्का देणारा आहे. लाभार्थी ग्राहकांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणला पाहिजे. उद्या राज्याचे अधिवेशन सुरु झाल्यावर आमदारांनी या प्रश्नावर निर्णय करून घेणे आवश्यक आहे. उर्जा विभागाची तीच इच्छा आहे असे वाटते, अशी प्रतिक्रिया वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली. तर महावितरणच्या सूत्रांनी प्रतिक्रिया देण्यास प्रतिसाद दिला नाही.