हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी अदाणी समूहाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वेगळी भूमिका मांडली. अदाणी समूहाला ठरवून लक्ष्य करण्यात आल्याचे नमूद करत पवार यांनी ‘जेपीसी’ चौकशीच्या मागणीलाही विरोध केला. संसदेच्या वाया गेलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज व्हावे, या दृष्टीने सत्ताधारी पक्षाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न न झाल्याची खंतही शरद पवारांनी व्यक्त केली आहे. ‘‘हिंडेनबर्ग अहवालातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरून संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत बराच काळ कामकाज होऊ शकले नाही. त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यानंतर संयुक्त चिकित्सा समितीची मागणी लावून धरणे योग्य नाही. अहवालाच्या मुद्द्यावरून देशभरात गोंधळ झाला आणि त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली’’, असे मत पवार यांनी व्यक्त केले. हेही वाचा : “अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…”, ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा टोला शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यामुळे विरोधी पक्षात फूट पडली का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळेंनी सांगितले की, "हा फूट होण्याचा मुद्दा नाही आहे. महागाई आहे किंवा नाही, याप्रश्नावरून आमच्यात फूट पडेल. पण, महागाई, बेरोजगारी, कांद्याचे भावावरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे, हे सर्वांना कळले पाहिजे." हेही वाचा : “गद्दारांना रस्त्यावर पकडून…”; बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा उल्लेख करत संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र! "अदाणींची चौकशी सुरू आहे. मात्र, आज दूधाचा भाव सर्वांसाठी महत्वाचा नाही का? दूध आयात केले, तर शेतकऱ्यांचे काय हाल होतील. शेतकऱ्यांना हे परवडणारे आहे का? आधीच शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहे. दूधाच्या आयातीसंदर्भात बातमी वृत्तपत्रात आल्यावर शरद पवारांनी तातडीने केंद्रीय मंत्र्याना पत्र लिहिले," असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.