उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर आता सुषमा अंधारेंनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. अमृता फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला. तसेच आरोप केलेल्या विषयांवर फडणवीसांनी खुली चर्चा करावी, असं आव्हान दिलं. त्या मंगळवारी (२७ डिसेंबर) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, "भरत गोगावलेंविषयी व्हॉट्सअॅप चॅटवर एक अपशब्द निघाला, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हा दाखल करून घेतात. सुषमा अंधारेला दिवसाढवळ्या जीवे मारण्याच्या धमक्या रोज दिल्या जातात. सोशल मीडियावर एका महिलेला अत्यंत गलिच्छ पद्धतीने बोललं जातं, त्यावर देवेंद्र फडणवीसांची जीभ अजिबात उचलत नाही." "अमृता फडणवीसांबद्दल कोणी बोललं तर फडणवीसांचे भक्तुल्ले…" "देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल कोणी बोललं तर फडणवीसांचे भक्तुल्ले तुटून पडतात. जेवढी आमच्या वहिनींची इज्जत महत्त्वाची आहे, तेवढीच तुमची बहिण म्हणून माझी इज्जत महत्त्वाची आहे. यावर फडणवीसांनी एकदा तरी बोलावं. कुठे शिळ्या कढीला उत आणत आहात," अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. "१३ वर्षे तुम्ही झोपला होतात का?" "देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. १३ वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का?" असा सवाल अंधारेंनी विचारला. हेही वाचा : “सावरकरांना ‘भारतरत्न’ नाही दिला तरी चालेल, पण…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर विधान परिषदेत गदारोळ, नेमकं काय घडलं? "सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही" सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, "तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही. यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही. हे आहे ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत." "फडणवीस आदित्य ठाकरेंबरोबरही चर्चेला बसले नाहीत, कारण…" "या धारकऱ्यांनी सुपारी घेऊन काम करणं सुरू केलं असेल, तर मला बाकीच्या भक्तुल्ल्यांविषयी अजिबात बोलायचं नाही. मात्र, फडणवीसांना माझी विनंती आहे की, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंबरोबरही चर्चेला बसले नाहीत. कारण फडणवीस खोटारडे आहात. म्हणूनच ते चर्चेला बसत नाहीत," अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. हेही वाचा : VIDEO: “सुषमा अंधारे माझ्या पक्षातही होत्या, पण…”, रामदास आठवलेंची जोरदार टोलेबाजी "मी फडणवीसांबरोबर चर्चेला बसायला तयार" "या सर्व विषयांवर मी फडणवीसांबरोबर चर्चेला बसायला तयार आहे. फडणवीसांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही अभ्यासू मंत्र्याला चर्चेला बसवावं. माझी चर्चा करण्याची तयारी आहे," असं आव्हान त्यांनी फडणवीसांना दिलं.