साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची वीज बिलांच्या रकमेची कपात ऊसाच्या रकमेतून केली जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याला विरोध केला आहे. या विरोधात जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी महावितरणच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांनी हे पाऊल उचलले आहे. तीन ते पाच हजार रुपये रकमेपर्यंत वसुली केली जाईल. त्या वरील रक्कम वसूल केली जाणार नाही. याला शेतकऱ्यांचा विरोध असेल तर कारखाने भूमिकेचा पुनर्विचार करतील., असे त्यांनी नमूद केले आहे. राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणची आर्थिक कोंडी झाली आहे. महावितरणने वीज बिलांची वसुली होण्यासाठी वेगवेगळे उपाय सुरू केले आहेत. त्यांनी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची वीजबिलांची वसुली बिलातून करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असताना त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. याची सुरूवात जवाहर साखर कारखान्याकडून सुरू झाली आहे. हा प्रकार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज बील वसुली सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. याला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवार) ३ वाजता जवाहर कारखान्यावर आंदोलन करण्यात येणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सकाळी जाहीर केले आहे. याबाबत जवाहर साखर कारखान्याची अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना सांगितले की, महावितरणने शेतकऱ्यांच्या वीज बिलातून कपात करून ही रक्कम भरावी अशा सूचना सर्वच साखर कारखान्यांना केल्या आहेत. यानुसार तीन ते पाच हजार रुपये पर्यंतची शेतकऱ्यांची रक्कम कारखाना स्वतःकडे ठेवणार आहे. या वसुलीला शासनाने संमती दिल्यानंतर ती महावितरणकडे भरली जाणार आहे. पाच हजार किंवा त्याहून अधिक मोठ्या रकमेची कपात करणार नाही, असे साखर कारखान्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाच्या, महावितरणच्या या भूमिकेनुसार जवाहर कारखान्याच्या काल झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याप्रमाणे निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला विरोध होणार असेल तर त्याचा साखर कारखाने फेरविचार करणार आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक अडवणूक करण्याचा साखर कारखान्यांचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर त्या कारखान्याच्या विरोधात आणि चेअरमनच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा… - “ वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलेली जी बिलं आहे, त्या संदर्भात मागील दोन वर्षांपासून आम्ही तक्रारी करत आहोत. जी वीज आम्ही वापरलेलीच नाही, त्याची बिलं आलेली आहेत. अनेक ठिकाणी मीटर बंद आहेत, अनेक ठिकाणी मीटर वरील रिडींग वेगळंच आहे आणि बिलावरील रिडींग वेगळंच आहे. ही बिलं दुरूस्त करून द्या आम्ही ती भरायला तयार आहोत, ज्या ज्या वेळी बिलं दुरूस्त करून दिली गेली. त्यावेळी शेतकऱ्यानी ऊसाची बिलं आल्यावर किंवा इकडूतिकडून पैस जमा करून महावितरणची बिलं भरलेली आहेत. असा असतानाही या सदोष बिलांच्या रकमेपोटी साखर कारखान्यातू परस्पर कपात करण्याचा धडका आता, वीज वितरण कंपनीकडून सुरू झालेला आहे. हे चुकीचं आहे बेकायदेशीर आहे, कयद्याने शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणालाही त्यांच्या ऊस बिलातून पैसे कापता येत नाही. अशा पद्धतीने जर कोणत्या कारखान्याने शेतकऱ्याच्या संमतीशिवाय शेतकऱ्यांचे पैसे परस्पर वसूल करून, महावितरण कंपनीला वळते केले तर त्या कारखान्याच्या विरोधात आणि चेअरमनच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही.” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.