नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील बीपीओ युनिटमधील कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाशी संबंधित आहे. या प्रकरणासंदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. नाशिक टीसीएस प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाने चा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नाशिक प्रकरणाची दखल घेत ५० पानांहून अधिकचा अहवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.
टीसीएस प्रकरणातील पीडित महिलांनी काय आरोप केले?
१) आमच्यासह कंपनीत छेडछाड केली जायची, याबाबत एचआरला कल्पना दिली पण त्या विभागाने काहीही केलं नाही.
२) आमच्या शरीरावर, रंगावर विचित्र पद्धतीने भाष्य करण्यात आलं होतं. अश्लील टिप्पणी करण्यात आल्या.
३) आरोपींनी एका पुरुषाला जबरदस्तीने नमाज पठण करायला लावलं होतं.
४) ऑफिसमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान केला जात होता. धर्माचाही अपमान केला जात होता.

एचआर निदा खानवर काय आरोप?
तपासकर्ते आणि पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान फक्त तक्रारींकडे दुर्लक्ष करत नव्हती. तर ती महिला कर्मचाऱ्यांशी दोस्ती करायची, त्यांना नमाज पठण कसं योग्य आहे ते सांगायची. तसंच हिजाब घालणं, मुस्लिम धर्मातल्या धार्मिक प्रथा कशा चांगल्या आहेत हे ठसवत होती. पीडितांचं हे म्हणणं आहे की निदा खानला ऑफिसमध्ये होत असणाऱ्या लैंगिक छळाबाबत आम्ही एकूण ७८ इमेल केले होते. त्यापैकी तिने कशाचीही दखल घेतली नाही. तक्रार करणाऱ्यांपैकी एका महिलेला उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात येऊ दिलं नाही. त्यांना तसा सल्लाही दिला नाही. या सगळ्या गोष्टी समोर आल्या असताना आता टीसीएसमध्ये काम करणाऱ्या महिलेनेच शोषण आणि धर्मांतरण कसं चालत होतं ते सांगितलं आहे. आता या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने अहवाल सादर केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने काय म्हटलं आहे?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात कार्यस्थळी लैंगिक छळ, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि POSH कायद्याच्या शून्य अंमलबजावणीचे गंभीर आरोप नोंदवले आहेत. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धांचा अपमान करुन महिलांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात करण्यात आला आहे. महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, तक्रार केल्यास बदली आणि नोकरी गमावण्याची भीती दाखवल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. POSH समिती पूर्णपणे निष्क्रिय असून नाशिक कार्यालयात कोणतीही जागरूकता व्यवस्था नव्हती. CCTV बसवलेले असले तरी ते बंद अवस्थेत असल्याचं आयोगाच्या निदर्शनात दिसून आलं आहे. NCW ने पोलिसांना Witness Protection Act अंतर्गत तक्रारदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने संबंधित आरोपींवर BNS कलम ७५, ७८, ७९ आणि २९९ अंतर्गत कारवाईची शिफारस केली असून टीसीएस व्यवस्थापनावरही कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातले मुद्दे काय?
- टीसीएसच्या नाशिकमधल्या बीपीओत एका धर्माला धरुन विषारी वातावरण होतं. एक प्रकारे हिंदू धर्माच्या विरोधात विष पसरवलं जात होतं.
- हिंदू धर्माचा अपमान करण्यात आला. तसंच जेन झेडच्या महिलांना ठरवून लक्ष्य करण्यात आलं.
- आरोपींनी महिलांवर टीका केली. धार्मिक टीपण्णी केली. तसंच धर्मावरच्या विश्वासाला तडा देण्याचं काम हेतुपुरस्सर केलं गेलं.
- हिंदू धर्म, त्यातल्या पुराणकथा यावरुन महिलांना लक्ष्य करण्यात आलं. त्यांच्यावर अभद्र कमेंट करण्यात आल्या.
- अनेक महिला या आत्ताच्या म्हणजेच जेन झी पिढीतल्या होत्या. या प्रकरणाचं गांभीर्य फारच मोठं आहे.
- टीसीएसच्या बीपीओतलं हे वातावरण भयानक होतं. त्यात लैंगिक शोषणही होत होतं.
टीसीएसचं प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं?
फेब्रुवारी २०२६ या महिन्यात नाशिक या ठिकाणी तिथल्या एका स्थानिक राजकीय कार्यकर्त्याने नाशिक शहर पोलिसांकडे एक तक्रार केली. त्यात त्याने असं म्हटलं होतं की टीसीएसच्या नाशिक बीपीओमध्ये काम करणारी २० वर्षीय हिंदू मुलगी रमझान महिन्याचे उपवास करते आहे. या तक्रारीनंतर घटनांची एक मालिका समोर आली. ज्यानंतर नऊ एफआयआर नोंदवण्या आले. लैंगिक शोषण, धर्मांतरण सात कर्मचाऱ्यांना अटक अशा सगळ्या घटना समोर आल्या. सोमवारी टाटा सन्सनचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करत आहोत असं सांगितलं.
पोलिसांनी तक्रार मिळाल्यावर तरुणीच्या कुटुंबाशी कसा संपर्क केला?
पोलिसांनी ज्या मुलीबाबत तक्रार मिळाली होती तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला. आमची मुलगी रमजान मध्ये उपवास ठेवते आहे असं तिच्या पालकांनी सांगितलं. तसंच ती इस्लामच्या पद्धतीनेच वागते आहे असंही सांगितलं. तपास पथकातल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आणि कंपनीत काय चाललंय याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक योजना आखली.
पोलिसांची योजना नेमकी काय होती?
पोलिसांनी टीसीएसच्या या बीपीओमध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाऊस किपिंग स्टाफ म्हणून नेमलं. त्याद्वारे टीसीएसमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली. दोन आठवड्यांनी आम्हाला आमच्या माणसांनी हे सांगितलं की अनेक गोष्टी या सुनियोजितपणे केल्या जात आहेत. कामावरुन सुटल्यानंतर ही माहिती आम्हाला आमचे कर्मचारी देत होते.आमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला पुरेशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करायला सुरुवात केली असं पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
धर्मांतरण, बलात्कार प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची नावं काय?
शफी शेख (वय -३४)
आसिफ अन्सारी (वय -२२)
तौसिफ अत्तार (वय-३६)
शाहरुख कुरेशी (वय-३४)
रजा मेमन (वय-३५)
दानिश शेख (वय-३४)
मागील आठवड्यात या प्रकरणात निदा खानलाही अटक करण्यात आली आहे.
