धर्मगुरू अभिजित सारंग ऊर्फ कालीचरण महाराज यांची ठाणे न्यायालयाने गुरूवारी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाल्यानंतर सुटका केली. कालीचरण यांच्या वकिलांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास वर्धा येथे सुरू असून त्यांना पुणे न्यायालयातून जामीन मिळाला आहे, असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने कालीचरण महाराज यांना जामीन मंजूर केला आहे. २९ डिसेंबर रोजी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. कालीचरण महाराजांची बाजू मांडणारे वकील पप्पू मोरवाल यांनी जामीनासाठी कोर्टात युक्तीवाद केला. “आमचा युक्तिवाद अगदी स्पष्ट होता की, जर त्याच प्रकरणाचा तपास एका विशिष्ट पोलिस ठाण्यात सुरू असेल, तर त्याच प्रकरणासाठी अन्य पोलिस ठाण्यातच कोठडीत ठेवण्याची गरज काय? या प्रकरणी दुसऱ्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची गरज नव्हती. पुणे न्यायालयाने त्यांना यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे आणि त्यामुळे ठाणे सत्र न्यायालयानेही गुरुवारी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली,” असे वकील पप्पू मोरवाल यांनी म्हटले. काय आहे कालीचरणचे प्रकरण? यापूर्वी कालीचरण महाराज यांना ठाणे न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. २६ डिसेंबर रोजी भाषणादरम्यान, स्वयंघोषित धर्मगुरु कालीचरण यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते महात्मा गांधीजींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत होते. कालीचरण यांनी भारताच्या फाळणीसाठी गांधींना जबाबदार धरले आणि गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला पाठिंबा दिला. त्यांनी गोडसेचे हत्येबद्दल आभार मानले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याला ३० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.