केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि निवडणुक आयोगाकडूनही त्यांनाच धनुष्यबाण निशाणी मिळणार असल्याचे निश्चित आहे, असे त्यांनी बोलून दाखवले.

“ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे राहिले नाहीत अंधे ते तर आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे बंदे.” त्यामळे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो घेऊन, बाळासाहेबांचा फोटो वापरू नये, वापरू नये असं जे त्यांना म्हटलं जातय. शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबडेकरांचा फोटो सगळे वापरतात, मग बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसेनेत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत, मग त्यांना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा का अधिकार नसावा? त्यामुळे त्यांना तो पूर्ण अधिकार आहे.” असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

त्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनांच मिळणार –

याचबरोबर, “खरी शिवसेना जी आहे ती आता एकनाथ शिंदे यांची आहे. दोन तृतीयांश बहुमत त्यांच्या बाजूला आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण ही निशाणी मिळेल. कारण, एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे बाळासाहेबांची आण, मग त्यांना का मिळणार नाही धनुष्यबाण. त्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनांच मिळणार आहे, हे जवळपास १२ खासदार आणि ४० आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, दुसरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे.” असं देखील आठवलेंनी यावेळी सांगितलं.

आरपीआयला मंत्रीपद मिळणार का? –

तसेच, आरपीआयला मंत्रीपद मिळणार का? या प्रश्नावर उत्तर देताना आठवले म्हणाले,“भाजपा मंत्रीपद देणार आहे, देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा नक्की विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही भाजपासोबत मागील आठ-दहा वर्षांपासून आहोत. त्यामुळे आम्हाला नक्की मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे. खातं कोणतं द्यायचं तो अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे खातं चांगलं राहील अशी आमची अपेक्षा आहे.”