भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले! इंडिया’ हा माहितीपट बुधवारी लोक भवन येथे दाखवण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा उपस्थित होते. युनिसेफ महाराष्ट्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शासकीय अधिकारी, दिव्यांग हक्क कार्यकर्ते आणि क्रीडापटू सहभागी झाले होते.
७० मिनिटांचा माहितीपट,वर्ल्ड ब्लाइंड गेम्सपर्यंतचं चित्रण
७० मिनिटांचा माहितीपट भारताच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंचा इंग्लंडमधील वर्ल्ड ब्लाइंड गेम्सपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण करतो. यामध्ये त्यांचे प्रशिक्षण, आव्हाने आणि जिद्द दाखवण्यात आली असून एजबॅस्टन येथे अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांनी सुवर्णपदक कसे पटकावले याची कथा आहे. हा माहितीपट खेळाडूंचा मेहनत, सर्वसमावेशकता आणि दिव्यांग तरुणांसाठी समान संधीचे महत्त्व अधोरेखित करतो.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा काय म्हणाले?
उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, हा माहितीपट समाजासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन येतो. “या तरुणींनी दयेची नव्हे तर संधीची मागणी केली. जेव्हा त्यांना ती संधी मिळाली, तेव्हा त्यांनी उत्कृष्ट कामगिरीही करून दाखवली. हा माहितीपट आपल्याला अपंगत्वाऐवजी जिद्द, मर्यादेऐवजी नेतृत्व आणि परावलंबित्वाऐवजी सन्मान मिळवण्याची धडपड दाखवतो.” दिव्यांग व्यक्तिंची समावेशकता ही रोजच्या जीवनाचा भाग बनली पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले. प्रत्येक मुलाला समाजात पूर्णपणे सहभागी होता यावे यासाठी लवकर निदान, दर्जेदार सेवा, समावेशक शिक्षण आणि समान संधी यांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
उपस्थितांचे स्वागत करताना युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंग म्हणाले की, हा माहितीपट क्षमता, धैर्य आणि आशेचा उत्सव साजरा करतो. “‘देख ले! इंडिया’ या माहितीपटाचे शीर्षक आपल्याला दिव्यांग व्यक्तींकडे सहानुभूतीच्या नजरेतून नव्हे, तर सन्मान, क्षमता आणि सकारात्मकता या दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन करते. आपण अडथळे दूर करून समान संधी निर्माण करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकतेची सुरुवात होते,” असे सिंग म्हणाले. या माहितीपटाच्या माध्यमातून युनिसेफ दिव्यांग सर्वसमावेशकता आणि मुलींच्या सक्षमीकरणाबाबत जनजागृती आणि संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच प्रत्येक मुलाला आपली पूर्ण क्षमता ओळखता यावी यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देते.
मुकुंद मूर्ती यांच्याकडूनही कौतुक
चित्रपट निर्माते मुकुंद मूर्ती आणि शांती मोहन यांनी संघाच्या या उल्लेखनीय प्रवासाचे चित्रीकरणाबाबत आपले अनुभव मांडले. “हा माहितीपट क्रिकेटपेक्षा खूप काही अधिक आहे. हा धैर्य, मैत्री आणि विश्वासाबद्दल आहे. सामाजिक, आर्थिक किंवा शारीरिक असो, कोणताही अडथळा जिद्दीपुढे टिकू शकत नाही, हे या तरुणींनी दाखवून दिले,” असे मूर्ती म्हणाले.
गंगा कदमने सांगितला तिचा अनुभव
भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदम हिने आपला अनुभव यावेळी सांगितला. “क्रिकेटने मला आत्मविश्वास, ध्येय आणि माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हा माहितीपट आमची गोष्ट तर आहेच. पण आयुष्यातल्या आव्हानांना तोंड देत काहीतरी साध्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. यामुळे अधिकाधिक कुटुंबांनी आपल्या मुलींवर विश्वास ठेवून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे,” असे गंगा म्हणाली. यावेळी संघातील इतर खेळाडू प्रिया कीर आणि सुषमा पाटील याही उपस्थित होत्या. महिला संघाच्या व्यवस्थापक शिखा शेट्टी यांनी क्रिकेटमुळे दृष्टिबाधित व्यक्तींना कशी मदत झाली आहे, याबद्दल सांगितले.
राज्यपाल आणि क्रिकेट संघातील सदस्यांमधील संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
