कराड : कराड दक्षिणचे विद्यमान आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड विमानतळ विस्तारवाढीच्या महत्त्वाकांक्षेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खो बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कराड विमानतळ विस्तारवाढ रोखा अशी आग्रही मागणी करत विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीने अजित पवार यांना साकडे घातले असता, उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असूनही तिथे विमानतळ विस्तारीकरणाला निधी देणे जिकिरीचे होत आहे. कराडमध्ये पुण्यासारखी गरज दिसून येत नसताना विमानतळ विस्तारवाढीची गरज काय अशी सडेतोड भूमिका मांडत अजितदादांनी मागणीकर्त्यांना दिलासा देत पृथ्वीराज चव्हाणांच्या महत्त्वाकांक्षेला डावलण्याची तयारीही दर्शवली. खरेतर कराड विमानतळाच्या विस्तारवाढीला पहिल्यापासून स्थानिकांचा मोठा विरोध राहिला, आंदोलनेही झाली. परंतु, पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारवाढीच्या कामाला चालना देण्याचे धोरण कायम ठेवत ते आक्रमक राहिल्याने अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, असे असताना राज्यात तीन पक्ष्यांच्या सरकारमधील नेत्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन याबाबत भाष्य करणे स्वाभाविक होते. परंतु, अजित पवारांनी सहजगत्या विमानतळ विस्तारवाढ निधीच्या कारणास्तव तूर्तास तरी शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. कराड विमानतळ विस्तारवाढीमुळे पाणस्थळ शेती नष्ट होणार आहे. त्यामुळे ही विमानतळ विस्तारवाढ रोखा असे साकडे कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले. यावर अजित पवारांनी आमची भूमिका व मागणी सकारात्मक घेऊन निश्चितपणे दिलासा दिला असल्याचे कृती समितीचे नेते पंजाबराव पाटील यांनी म्हटले आहे. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, अजित पवार व विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पंजाबराव पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. स्थानिक लोकप्रतिनिधी व नेतेमंडळीही उपस्थित होती. या वेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले. कराड विमानतळ विस्तार वाढीला विरोध का? याची मुद्देसूद मांडणी करताना, लेखी निवेदनही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विमानतळ विस्तारवाढीमुळे तेथील भैरवनाथ पाणी पुरवठा योजना नामशेष होताना पाच गावातील शेतीला पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवेल, अशी चिंता अजित पवार यांच्यासमोर व्यक्त करण्यात आली. तिन्ही बाजूला डोंगर आणि टॉवर असल्याने ही विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही दृष्टीने फायद्याची नसल्याचे यावेळी कृती समिती पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले. विमानतळ विस्तारवाढ कृती समितीचे नेते भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष विनायक शिंदे, आनंदराव जमाले, रमेश लवटे आदी बैठकीला उपस्थित होते.