राज्यात देशातील पहिलं ‘मधाचं गाव’ साकारलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची निवड करणं हा अत्यंत महत्वाचा भाग होता. या गावाची निवड करताना अनेक बाबींची काळजी घेणं आवश्यक होतं. गावाची भौगोलीक रचना, गावातील लोकांचे व्यवसाय, या संकल्पनेसाठी आवश्यक असणारी नैसर्गीक साधनसंपत्ती या आणि अश्या अनेक बाबींची पुर्तता होणं गरजेचं होतं. राज्यातील अनेक गावांची तपासणी केल्यानंतर एका गावाची निवड करण्यात आली. मधाचे गाव साकारण्यासाठी महाबळेश्वर येथील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे. मांघर हे गाव महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर सुंदर फुलं फुललेली असतात. या प्रकल्पासाठी याच गावाची निवड करण्याचं मुख्य कारण म्हणजे या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केले जाते. मांघर या गावातील ८० टक्के लोकसंख्या ही मधमाशापालनाचा व्यवसाय करते मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायम स्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहीले जाते. मधमाशांच्यामुळे पिक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे.




अश्याप्रकारचा देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्हात देखील हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.